Breaking News

बालनाट्य, हलक्याफुलक्या नाटकांचा कर्ता हरपला जेष्ठ साहित्यिक, रंगकर्मी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे निधन :नामवंतांची श्रध्दांजली

मुंबई : प्रतिनिधी
मराठी साहित्यात वाचकांना वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथांची ओढ लावणाऱ्या रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. मतकरी यांना काही दिवस थकवा जाणवत होता. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तपासणी दरम्यान मतकरी यांना कोव्हीड १९ चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण तिथेच त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांच वय ८१ वर्ष होते.
वयाच्या सतराव्या वर्षी, १९५५ साली मतकरी यांनी लिहलेली वेडी माणसं ही एकांकिका मुंबई आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाली. तेव्हापासून सुरू झालेली मतकरी यांची भटकंती आतापर्यंत चालू होती. अश्वमेध, दुभंग, माझं काय चुकलं?, जावई माझा भला, चार दिवस प्रेमाचे, घर तिघांचं हवंय, खोल खोल पाणी, इंदिरा या मतकरींच्या नाटकांनी मराठी रसिकांची दाद मिळवली होती. त्यांनी लिहलेली लोककथा ७८ अजूनही मराठी वाचकांच्या स्मरणात आहे. बाल साहित्यातही मतकरी यांनी छाप पाडली होती. अलीकडच्या काळातील अलबत्या गलबत्या, निम्मा शिम्मा राक्षस या बाल नाट्यासह महाभारतावर आधारित आरण्यक नाटकाने रंगभूमीवर वेगळा आयाम रचला होता.
मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.
रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होतो. रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक, समीक्षक गणेश मतकरी, जावई डॉ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राचे साहित्य ‘रत्न’ निखळले: मुख्यमंत्री
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार श्री रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे. ते साहित्य विश्वातले अमूल्य असे रत्न होते. त्यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ आनंद दिला. आमच्या पिढीतल्या लहानांचे भाव विश्व साकारले, महाराष्ट्राचे साहित्य- नाट्य क्षेत्र समृद्ध केले. एकीकडे अनेक मानाचे पुरस्कार मिळत असतांनाही रत्नाकर मतकरी हे रसिकांना निखळ आनंद देण्यासाठी सच्चेपणाने नवनवीन साहित्य लिहीत गेले. त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे असून महाराष्ट्राचे साहित्य’रत्न’ आज निखळले. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

साहित्य, कला, सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्व हरपलं-उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्व हरपलं असून साहित्यिक, रंगभूमी, सांस्कृतिक क्षेत्रातलं रत्नाकर मतकरी यांचं योगदान चिरंतन राहिल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मतकरींच्या निधनाने महाराष्ट्राने बहुआयामी ‘रत्न’ गमावले!: थोरात
ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक बहुआयामी ‘रत्न’ गमावले आहे. त्यांच्या निधनाने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

Check Also

६२ वसतिगृहे या जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यास सरकारची मान्यता

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *