मुंबई: प्रतिनिधी
काल वांद्रे स्टेशन परिसरात बांधकाम मजूर आणि कामगारांचा जो जमाव गोळा झाला त्यानंतर आज भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी या मजुरांच्या विविध संस्था-संघटना यांच्याशी संवाद साधला.. त्यातून विविध बाबी व त्यांच्या अडचणी समोर आल्या त्याबाबत आज पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून हे मुद्दे सरकारच्या लक्षात आणून दिले आहेत.
कामगारांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू बाबत त्यांच्या समस्या आहेतच त्यासोबतच यामध्ये अत्यंत छोटा पण या कामगारांच्या दृष्टीने महत्त्वाचा नवा मुद्दा समोर आला आहे. यातील बहुतांश कामगार हे “प्रीपेड मोबाईल” वापरतात व त्यांच्या मोबाईलचे रिचार्ज आता संपत आले आहेत. मोबाईल रिचार्ज सुरू करण्याची दुकाने सुरु नाहीत, ऑनलाईन रिचार्ज करणे सर्वांना शक्य नाही किंवा जमत नाही. त्यामुळे त्यांचा त्यांच्या गावाशी, नातेवाईक व मुकादमाशी असलेला संपर्क तुटू लागला आहे. त्यातून अस्वस्थता वाढते आहे. याबाबत काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.