मुंबई: प्रतिनिधी
आपण ज्या घोषणा करतो, त्याप्रमाणे ते करतो का, याचा राज्य सरकारकडून विचार होणे आवश्यक आहे. ८० टक्के खाटा अधिग्रहित करण्यात येणार असल्याचे केवळ सांगण्यात आले, पण रूग्णांना खाटा मिळत नाही, ही वास्तविकता आहे. राज्य सरकारची ‘पुनश्च हरिओम’ ही संकल्पना चांगली आणि ती आवश्यकच आहे. सुरूवातीला काही अडचणी येतील. पण, खुल्या दिलाने ‘पुनश्च हरिओम’ पुढे न्यावे लागेल. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यातील अडचणी आणि न घेण्यातील धोके यातून सुयोग्य मार्ग काढावा लागेल. भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावे लागतील. म्हणजे योग्य निर्णय होईल. सध्या तरी राज्यात आजची अवस्था ही ‘केवळ पॉलिसी पॅरालिसिस’ नाही, तर ‘अॅक्शन पॅरालिसिस’ची सुद्धा असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केली.
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांबाबत पंचनामे करून अंतिम मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येईलच. तथापि आज चक्रीवादळग्रस्तांना केवळ १०० कोटींची जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका त्यांनी केली.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान हे अतिशय मोठे आहे. पंचनामे झाल्यावर मदत जाहीर होईलच. पण, कोल्हापूर, सांगली आणि कोकणात पुरामुळे गेल्यावर्षी प्रचंड नुकसान झाले, तेव्हा काही निर्णय आम्ही घेतले होते. ६८०० कोटींचे पॅकेज पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आणि कोकणासाठी तेव्हा जाहीर करण्यात आले होते. प्रचलित नियमांच्या बाहेर जाऊन काही निर्णय घेण्यात आले होते. तसेच निर्णय आता अपेक्षित आहेत. ज्यांनी कर्ज घेतले नाही, अशा शेतकर्यांना प्रचलित पद्धतीच्या तीनपट मदत देण्याचा अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला होता. बारा बलुतेदार, दुकानदार अशा सर्व घटकांना मदत देण्याचा निर्णय करण्यात आला होता. अशाच प्रकारचे निर्णय आज आवश्यक असल्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
१२० देशांना भारत आज औषधी पुरवितोय्. पीपीई किट आणि एन-95 मास्कची निर्मिती आता भारतात होतेय. देशभरात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली. महाराष्ट्रात सुद्धा आता ३५ हजार चाचण्यांची दैनंदिन क्षमता तयार झाली आहे. असे असले तरी मुंबईत १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण चाचण्यांपैकी ५६ टक्के चाचण्या मुंबईत होत्या. ३१ मे रोजी ते प्रमाण २७ टक्क्यांवर आले. म्हणजे चाचण्या झाल्या पण, मुंबईबाहेर. मुंबईत सर्वाधिक रूग्ण आढळत असताना मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Tags cm uddhav thackeray covid-19 politics devendra fadnavis
Check Also
नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …