Breaking News

पंतप्रधान म्हणाले “महाराष्ट्र के लोग बहादूर”, तर मुख्यमंत्री म्हणाले ” लढ्याचा परिणाम दिसेल” पंतप्रधानांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास

मुंबई: प्रतिनिधी

माझे कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आपल्याला दिसेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते म्हणाले. कोविडनंतर देखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील यावेळी बैठकीत सहभाग घेतला

महाराष्ट्र के लोग बहादूर- पंतप्रधान

यावेळी पंतप्रधानांनी देखील महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है असे सांगून कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले कि, पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरून परत एकदा देशातील नागरिकाना संबोधन करून कोरोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढ्याचा आहे याविषयी मार्गदर्शन करावे. येणाऱ्या काळात सणवार, उत्सव येत असून कोरोना वाढू नये म्हणून आपल्यासमोर आव्हान आहे.

दररोज दीड लाखापर्यंत चाचण्या वाढविणार –मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्य सरकार करीत असलेल्या काही महत्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्यात लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातून दोन द्राव्य घेतले जातात.रॅपिड एन्टीजेन चाचणी  निगेटिव्ह आली तर दुसरा घेतलेला द्राव्य आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठविला जातो, औषधांची उपलब्धता ठेवली आहे, दररोज दीड लाखपर्यंत चाचण्या वाढवीत आहोत अशी माहिती दिली

टेलीआयसीयू राज्यात सर्वत्र

राज्यात प्रायोगिक तत्वावर टेलीआयसीयू व्यवस्था सुरु केली असून येणाऱ्या काळात याची उपयुक्तता पाहता सर्वराज्यात ही यंत्रणा उभारून विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात शहरातील तज्ञ डॉक्टर्सचे उपचारांसाठी मार्गदर्शन घेण्याचे आम्ही ठरविले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ऑक्सिजन उत्पादन व वितरणावर नियंत्रण हवे

राज्यात ठिकठिकाणी जम्बो सुविधा, चाचण्यांची व्यवस्था, प्रयोगशाळा उभारल्या आहेत, आम्ही न थकता लढतो आहोत आणि हरणार नाही असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता असून केंद्राने वैद्यकीय ऑक्सिजनच्या किंमतीचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे तसेच वितरणाच्या बाबतीत देखील नियंत्रण असणे गरजेचे आहे.

लस पुरवठ्याचे नियोजन हवे 

लस उत्पादन लवकरात लवकर व्हावे म्हणून ट्रायलची प्रक्रिया लवकर व्हावी तसेच या लसीच्या वितरणाचे योग्य नियोजन आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दिले चष्म्याच्या सवयीचे उदाहरण

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मास्कची सवय कशी अंगी बाणवावी याविषयी बोलताना चष्म्याच्या सवयीचे साधे उदाहरण दिले. ते म्हणाले कि, पूर्वी जेव्हा चष्मा वापरायला सुरुवात झाली, त्यावेळी त्याचा लोकांना खूप त्रास झाला असणार, तो घालणे चेहरा आणि नाकासाठी अडचणीचे झाले असणार पण नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की आज त्याचा त्रास होत नाही.

पंतप्रधानांना हे उदाहरण इतके आवडले कि त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उदाहरणाचा उल्लेख केला व पुढील काळात मास्क ही आपली अपरिहार्यता आहे असे सांगितले.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी : २६% घरांना पथकांनी भेटी दिल्या 

राज्यात ५५ हजार टीम्स तयार करण्याचे निश्चित केले होते. मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे  ५९ हजार टीम्स तैनात. मोहीम सुरु झाल्यापासून राज्यात ७० लाख ७५ हजार ७८२ घरांना भेटी दिल्या (२६% घरे भेटी झाल्या) देऊन २.८३ लाख ६३ हजार लोकांचे  आरोग्य सर्व्हेक्षण झाले.( १८ % कव्हर). ४८२४ कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती तसेच ७  लाख ५४ हजार कोमॉर्बिड लोक आढळले.

कोरोना काळात राज्य सरकारने काही खूप चांगली पाऊले उचलली आहेत. राज्यातील सर्वच नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ . खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक केले. चाचण्यांचे दर नियंत्रित केले. तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स तयार केला. जिल्ह्यातील डॉक्टर्सचे टास्क फोर्स केले. गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या स्थापन केल्या.

ऑक्सिजनचे उत्पादनही आम्ही नियंत्रित केले आहे. एकूण ऑक्सिजन उत्पादनाच्या ८० टक्के पुरवठा आता मेडिकलसाठी व २० टक्के पुरवठा उद्योगांसाठी करणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. ऑक्सिजन उपलब्धतेसाठी व येणाऱ्या अडचणींसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना.

गेल्या महिन्यात राज्यात १८ RTPCR  चाचणी प्रयोगशाळा सुरु झाल्या. सध्या राज्याची चाचणी क्षमता ८० हजार चाचण्या इतकी आहे. आयसीएमआरने निश्चित केलेल्या १४० दर दशलक्षपेक्षा जास्त म्हणजे  ६७७ चाचण्या केल्या जातात. ऑगस्ट महिन्यात दर दिवशी ६५ हजार चाचण्या होत असत. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातून दोन द्राव्य घेतले जातात. Rapid Antigen Test निगेटिव्ह आली तर दुसरा घेतलेला द्राव्य RTPCR चाचणीसाठी पाठविला जातो. RTPCR चाचणी कीट अतिशय स्पर्धात्मक किंमतीत खरेदीस सुरुवात

बेड्स उपलब्धता

मार्च २०२० मध्ये ७७२२ बेडस,आयसीयु बेडस ३०९१ आणि ११४३ व्हेंटीलेटर्स

आज एकूण उपलब्ध बेडची संख्या ३.६० लाख एवढी आहे.

राज्यात क्वारंटाईनसाठी ३५३ संस्थामध्ये १६,१९२ खाटांची सोय होती.

सध्या १०१० संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये १,२४,२८४ खाटा उपलब्ध आहेत

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *