Breaking News

विद्यार्थ्यांना खुषखबर ? अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता विद्यापीठ अनुदान समितीला पत्र पाठविल्याची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
विद्यापीठ अनुदान समितीने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान घ्याव्यात अशा सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे राज्य शासनाने निर्णय घेतला होता. पण, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रापर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. त्याच प्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात याविषयी युजीसीला पत्र पाठविण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणे शक्य होणार नसल्याचे युजीसीला पाठविलेल्या पत्रात नमुद केल्याचे सांगून ते म्हणाले की, राज्यातील ८ ते १० लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा तसेच मानसिक स्वास्थ्याचा विचार करता अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना मार्क्स ग्रेडेशन पद्धतीने देण्याविषयी युजीसीला लिहले आहे. या प्रकारे ग्रेडेशन करताना कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने हे मार्क्स ग्रेडेशन करण्यात येणार आहे. युजीसीच्या मार्गदर्शनानुसारच हे ग्रेडेशन देण्यात यावे. याविषयी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून त्यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासन राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल. विद्यार्थ्यांच्या हिताचा, आरोग्याचा आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करून युजीसीला पत्र पाठविल्याचे त्यांनी सांगितले.
याविषयी ठोस निर्णय घेण्यासाठी पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव अजोय महेता, शिक्षण सचिव विजय सौरव यांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच राज्यातील कुलगुरूंशी चर्चा करून युजीसीच्या सुचनांप्रमाणे ग्रेडेशनची पद्धत स्वीकारून पुढे काय करायचे याविषयी मुख्यमंत्री यांच्या संमतीने येत्या दोन दिवसात ठोस निर्णय घेतला जाणार आहे.
सीईटीच्या परिक्षांसाठी तालुकास्तरावर केंद्र
सीईटीच्या परीक्षांसाठीचे वेळापत्रक सध्या जाहीर करण्यात आले आहे. पण त्याविषयी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून काही निर्णय घ्यावे लागले तर तसे निर्णयही भविष्यात घेतले जातील. सध्या जुलैच्या ४ तारखेपासून ३१ तारखेपर्यंत युजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. यामधून काही विद्यार्थ्यांची परीक्षा राहिल्यास पुन्हा ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ५ लाख २४ हजार ९०७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. पण, यापरीक्षा देताना काही विद्यार्थी शिल्लक राहीले तर त्यांचाही विचार या परीक्षांमध्ये करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा केंद्रांवर होणारी ही परीक्षा तालुका केंद्रावर घेण्यात येणार आहे. तालुका केंद्रावर परीक्षा घेतलाना सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन केले जाईल. विद्यार्थ्यांना सेंटर बदलाची मुभा मिळणार असून लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यात अडचणी उद्भवल्यास त्यांना केंद्रावर नेण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू
वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय व पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे किंवा इतर काही कारणांमुळे लिंक, वेबसाईटमध्ये काही अडथळे निर्माण झाले असतील तर त्या लिंक, वेबसाईटही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या उर्वरीत सीईटी परीक्षांच्या तारखाही लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत, त्यांच्या परीक्षा फी पुढील सत्रासाठी वापरणे किंवा त्यांना फी परत करणे याविषयी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *