मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि प्रादुर्भाव लक्षात घेवून इयत्ता दहावीचा भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपरला स्थगिती दिली होती. मात्र विषाणूचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसल्याने अखेर हे दोन्ही पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या दोन पेपरची परिक्षा न देता गुण देण्यात येणार आहेत. तर ११ वी आणि ९ वीच्या संभावित दुसऱ्या सत्राची परिक्षा न घेता त्यांनाही वर्षभरातील त्यांचे मुल्यमापन करून त्यांनाही गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
१० वीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षा महामंडळाच्या प्रचलित व विहित कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नववी आणि अकरावीची परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात टाळेबंदी लागू आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र राज्यातील परिस्थिती बघता ही टाळेबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली असल्याने नववी व अकरावीच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा न घेता, पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चाचण्या, प्रात्यक्षिके आणि अंतर्गत मुल्यमापन करून विद्यार्थ्यांची वर्गोन्नती करून त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने शासनास सादर केला होता. यावर निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यक त्या सूचना संबधितांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.