Breaking News

मुख्यमंत्र्यांसह महा आघाडीचे ५ आणि भाजपाचे ४ उमेदवार रिंगणात काँग्रेसमधून खान, सावंत, हुसेन तर भाजपातून तावडे, मुंडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात राजकिय स्थिरता आणण्याच्या उद्देशाने विधान परिषदेची निवडणूक घेण्याचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. या निवडणूकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विद्यमान उपसभापती अॅड.नीलम गोऱ्हे यांची नावे निश्चित सांगण्यात येत आहेत. तर काँग्रेसकडून दोन उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे पाच उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. भाजपाकडून चार उमेदवार उभे करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
काँग्रेसच्या वाट्याला या निवडणूकीत दोन जागा मिळणार असून या दोन जागांसाठी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, नसीम खान आणि मुझ्झफर हुसेन यांच्या नावाची चर्चा पक्षांतर्गत सुरु आहे. यातील खान आणि सावंत यांचे पारडे जड असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एका जागेवर उमेदवार उभा करण्यात येणार आहे. वास्तविक पाहता त्यांच्या वाट्याला दोन जागा येणार होत्या. मात्र राज्यसभेसाठी काँग्रेसने एक अतिरिक्त जागा राष्ट्रवादीला सोडली. त्यामुळे विधान परिषदेची त्यांच्या हिश्शाची जागा काँग्रेसला देण्यास येणार असल्याची माहिती काँग्रेसमधील एका पदाधिकाऱ्याने दिली.
तर भाजपाकडून चार उमेदवार देण्यात येणार असून या चार जांगाकरिता पंकजा मुंडे, विनोद तावडे या दोन नावांची चर्चा असली तरी यापैकी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळून पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील दोन उमेदवारांची नावे आयत्यावेळी पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरु आहेत. यात भाजपाकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर सारे अवलंबून असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांने सांगितले.

निवृत्त झालेले सदस्य
अॅड.नीलम गोऱ्हे (शिवसेना), हेमंत टकले (राष्ट्रवादी काँग्रेस), किरण पावस्कर (राष्ट्रवादी), ठाकूर आनंद, स्मिता वाघ (भाजपा), पृथ्वीराज देशमुख, अरूणभाऊ अडसड, चंद्रकांत रघुवंशी (काँग्रेस), हरिसिंग राठोड (काँग्रेस) आदी सदस्य २४ एप्रिल रोजी निवृत्त झाले.

विधान परिषद निवडणूक कार्यक्रम
४ मे २०२० अधिसूचना जारी होणार
११ मे २०२० अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
१२ मे २०२० अर्जाची छानणी
१४ मे २०२० अर्ज मागे घेण्याची तारीख
२१ मे २०२० सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजे.मतदान
२१ मे २०२० संध्या. ५ नंतर मतमोजणी

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *