Breaking News

काँग्रेस अध्यक्षा पंतप्रधानांना म्हणाल्या, आम्ही सोबत पण हे सल्ले अंमलात आणा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली: प्रतिनिधी

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षिय नेत्यांशी संवाद साधला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या आजाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारने विशेषत: पंतप्रधानांनी काय करावे याबाबतचे पाच कलमी सल्ले देत त्याची अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच या आजाराचा सामना करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोबत असल्याची ग्वाहीही त्यांनी पंतप्रधानांना एका पत्राद्वारे दिली आहे.

मा. पंतप्रधान

कोवीड-१९ विषाणूच्या विरोधात लढण्यासंदर्भात आपल्याशी फोनवर चर्चा झाली. आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार काँग्रेस पक्षातर्फे मी यासंदर्भात काही सुचना आपणास या पत्राद्वारे करत  आहे.

खासदारांच्या ३० टक्के वेतन कपातीच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. कोवीड-१९ या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी फार मोठा निधी उभा करणे ही काळाची गरज आहे.

यासंदर्भातच मी पाच प्रस्ताव देत आहे. मला विश्वास आहे की आपण ते अंमलात आणाल.

१)      सरकारी जाहिराती…टीव्ही, वर्तमानपत्र व विविध ऑनलाईन जाहिराती दोन वर्षे बंद करुन त्यातून वाचणारा पैसा हा कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी उपयोगात आणावा. यातून कोरोनासंदर्भात जनजागृती करणाऱ्या जाहिराती मात्र वगळण्यात याव्यात. केंद्र सरकार सरकारी जाहिरातींवर दरवर्षी १२५० कोटी रुपये खर्च करते. याशिवाय सरकारी उपक्रम व सरकारी कंपन्यांच्या जाहिरातींवरही मोठा खर्च होत असतो. हा सर्व खर्च टाळला तर यातून मोठा निधी कोरोनाविरोधात लढण्यासाठी तसेच समाजाच्या मदतीसाठी उपयोगात येईल.

२) ‘सेंट्रल विस्टा’ पुनर्विकास व सुशोभिकरणासाठी २० हजार कोटी रुपये खर्च केला जात आहे. सध्याची परिस्थीती पाहता एवढा मोठा खर्च करणे अयोग्य असून या कामाला स्थगिती देण्यात यावी. मला विश्वास आहे की सध्याच्या इमारतीतूनच संसद आपले संपूर्ण कामकाज करू शकते. आजच्या आपत्कालीन परिस्थितीत नवीन संसद व त्याची नवीन कार्यालये बांधण्याची गरज नाही. अशा संकटाच्या वेळी हा खर्च टाळता येऊ शकतो. या पैशांचा उपयोग नवीन रुग्णालये आणि वैद्यकीय संरक्षण उपकरणे (‘पीपीई’) देण्यासाठी तसेच आरोग्य कर्मचार्‍यांना अधिक चांगल्या सुविधांसाठी करणे आवश्यक आहे.

३) भारत सरकारच्या खर्चाच्या अर्थसंकल्पात (पगार, निवृत्तीवेतन आणि मध्यवर्ती क्षेत्रातील योजना वगळता ) समान प्रमाणात 30 टक्के कपात केली जावी. ही ३० टक्के रक्कम (वर्षाकाठी सुमारे अडीच लाख कोटी रुपये) ही स्थलांतरित कामगार, कामगार, शेतकरी, हातावरचे पोट असलेले मजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या मदतीसाठी वापरली जावी. 

४) राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यातील मंत्री तसेच अधिकारी वर्गांचे परदेश दौरे स्थगित करण्यात यावेत. फक्त देशहिताच्या, आपत्कालीन व अत्यावश्यक असलेल्या परदेश दौऱ्यांनाच पंतप्रधानांनी परवानगी द्यावी. परदेश दौऱ्यांवर होणारा असा खर्च ( मागच्या पाच वर्षात पंतप्रधान तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर ३९३ कोटी रुपयांचा खर्च झाला होता ) कोरोनाच्या लढाईसाठी उपयोगी आणला जाऊ शकतो.

५) पंतप्रधान केअर फंडातील संपूर्ण निधी हा पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमध्ये वर्ग करावा. यामुळे हा निधी ज्या पद्धतीने वाटप आणि खर्च केला त्यानुसार कार्यक्षमता, पारदर्शकता, जबाबदारी आणि लेखा परीक्षण सुनिश्चित करेल. सार्वजनिक सेवेसाठी अशा पद्धतीने दोन वेगवेगळे निधी तयार करणे हा वेळेचा व साधनसंपत्तीचा अपव्यय करण्यासारखे आहे. माझ्या माहितीप्रमाणे पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये ३८०० कोटी रुपयांचा निधी (आर्थिक वर्ष २०१९) पडून आहे. हा निधी तसेच पंतप्रधान केअर निधीत जमा झालेली रक्कम एकत्र करुन समाजातील गरजू व्यक्तींना अन्नधान्य व इतर मदतीसाठी वापरावी.

कोरोना विषाणूच्या या राष्ट्रीय आपत्तीवेळी देशाचा प्रत्येक नागरिक सहकार्य करत आहे. आपल्या कार्यालयाने घेतलेला प्रत्येक निर्णय व सूचनांचे पालन लोक करत आहेत. आता जनतेने आपल्यावर ठेवलेल्या  विश्वासाला सार्थ ठरवण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे.

कोवीड-१९ च्या या संकटावेळी आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत.

Signed Copy of CP letter to PM 07.04.20

 

Check Also

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची उद्या मुंबईत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या २७ मार्च रोजी सकाळी ११ वा, केंद्रीय संसदीय कार्यकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *