मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केलेला असल्याने या कालावधीत सर्वच व्यावसायिक संस्था, रोजगाराच्या संधी बंद आहेत. त्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच ज्यांचे उत्पन्न ५९ हजार ते १ लाख रूपयांपर्यत असणाऱ्या केशरी कार्डधारकांना ८ रूपये प्रति किलो या दराने गहू आणि १२ रूपये दराने प्रति किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नागरी पुरवठा विभागाचे संचालक कैसाल पगारे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत ज्यांचा समावेश झालेला नाही अशांनाही याचा लाभ मिळणार आहे. तसेच प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रति व्यक्ती देण्यात येणार असल्याचे सांगत याचे वाटप २४ एप्रिल २०२० पासून सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्न योजनेतंर्गत १३७५४ मेट्रीक टन तांदूळ, २०००५ मेट्रीक टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. तर २५३६० मेट्रीक टन मोफत तांदळाचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय शिधापत्रकधारकांनी राज्य सरकारकडून द्यावयाच्या धान्याची http://mahapeos.gov.in या संकेतस्थळावर जावून RC details मध्ये जावून शिधापत्रिकेवरील १२ अंकी SRC नंबर टाकून खात्री करावी असे सांगत जर एखाद्या अधिकृत रेशन दुकानदाराने त्या धान्याचे नियमानुसार वाटप केले नसेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केशरी रेशनकार्डधाराकांना स्वस्तात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मात्र केंद्राकडून उत्तर देण्याआधीच राज्य सरकारने केशरी कार्डधारकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिला.