Breaking News

कोरोना संसर्गाचे प्रमाण देशापेक्षा मुंबईत जास्त ,तब्बल २८ टक्के मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहीत मुंबईतील कमी चाचण्यांकडे फडणवीस यांनी वेधले पुन्हा लक्ष

मुंबई: प्रतिनिधी
मुंबईत सातत्याने कमी होत असलेल्या चाचण्या, त्यामुळे संसर्ग शोधण्यात येत असलेल्या अडचणी, मृत्यूसंख्येची अद्याप होत नसलेली फेरपडताळणी, मृतदेहांची कोरोना चाचणी होत नसल्यामुळे कोरोना योद्ध्यांनाच मदतीपासून वंचित रहावे लागणे, याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, काल १ जुलै २०२० रोजी केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सर्व राज्यांना एक पत्र पाठवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याचा आग्रह धरला आहे. विविध राज्यांमध्ये असलेली चाचण्यांची क्षमता आणि त्याचा वापर होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. मुंबईत १ जून रोजी २,०१,५०७ चाचण्या झाल्या होत्या. ती संख्या ३० जून रोजी ३,३३,७५२ इतकी झाली. याचा अर्थ जून महिन्यात मुंबईत १,३२,२४५ चाचण्या झाल्या आहेत. याचाच अर्थ मुंबईत दररोज सरासरी ४४०८ इतक्या चाचण्या होत आहेत. यातील पुन्हा होणार्‍या चाचण्यांची संख्या वजा केली तर ४००० चाचण्या दररोज होत आहेत. या १,३२,२४५ चाचण्यांपैकी ३६,५५९ इतके रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. याचाच अर्थ मुंबईत संसर्गाचे प्रमाण हे २८ टक्के आहे. म्हणजे प्रत्येक १०० व्यक्तिंमागे २८ व्यक्तींना संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. देशाच्या तुलनेत हा दर कितीतरी अधिक आहे. देशात २९ जूनपर्यंत ८६,०८,६५४ चाचण्या झाल्या होत्या आणि त्यात ५,४९,९४६ रूग्णसंख्या होती. हा दर ६.३९ टक्के आहे.
चाचण्या नियंत्रित केल्या जात असल्याकडे लक्ष वेधून ते या पत्रात म्हणतात की, नियंत्रित चाचण्यांमधून रूग्णसंख्या कमी-अधिक भलेही करता येईल. पण, संसर्ग वाढण्याचा धोका यापेक्षा अधिक मोठा आहे. मुंबईतील आतापर्यंतच्या एकूण ४५५६ मृत्यूंपैकी या एकट्या जून महिन्यात ३२७७ मृत्यू दर्शविण्यात आलेले आहेत. सांख्यिकी योग्य नसेल तर एकूणच प्रशासनाला कोरोनाविरूद्धची उपाययोजनांची दिशा आखणे अतिशय कठीण होऊन बसणार आहे. दररोज जवळजवळ २०० च्या आसपास मृत्यूसंख्या महाराष्ट्रात दाखविण्यात येते. त्यातील ६० ते ७० मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील दाखविण्यात येतात आणि १२० च्या आसपास हे त्या पूर्वीचे म्हणून दर्शविले जातात. मृत्यूसंख्येची फेरपडताळणीची प्रक्रिया ही लगेच पूर्ण केली पाहिजे आणि रोजचे मृत्यू रोज दाखविले जातील, अशी व्यवस्था तातडीने उभारली पाहिजे. मुंबईत रूग्णालयाबाहेर झालेले मृत्यू एकदा संपूर्णपणे जाहीर केले पाहिजे. ही व्यवस्था झाल्याशिवाय कोविडविरूद्धची रणनीती आखणे अवघड होणार आहे. विशेषत: मुंबईतील रूग्णसंख्या या जून महिन्यात ९४ टक्के, ठाण्यात १६६ टक्के, कल्याण-डोंबिवलीत ४६९ टक्के, मिरा भाईंदरमध्ये ४१३ टक्के, भिवंडीत १४७० टक्के, पनवेलमध्ये ३६४ टक्के, नवी मुंबईत १९० टक्के इतकी वाढली असताना ही काळजी घेण्याची गरज अधोरेखित होते.
मृतदेहांची चाचणी न करण्याचा फटका आता थेट कोरोनायोद्ध्यांनाच बसतो आहे. ऐरोलीत बंदोबस्तावर असणारे पोलिस मंगेश कांबळे यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांची कोरोना चाचणी करण्यास रूग्णालयाने नियमावर बोट ठेवत नकार दिला. त्यांच्या पत्नीला लक्षणे असल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली आणि त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या. आता त्यांची चाचणी न झाल्याने कोरोनामृत्यू म्हणून त्यांच्या कुटुंबीयांना मिळू शकणारी मदत मिळणार नाही. शिवाय, यामुळे नेमके किती कोरोनामृत्यू झाले, हेही कळू शकणार नाही. अधिक संख्येने चाचण्या हाच या संकट निवारणातील मुख्य आधार असल्याने त्याकडे तातडीने लक्ष द्यावे. राज्याची पूर्ण चाचणी क्षमता त्वरित वापरावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

Check Also

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी सुरुय

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील लोकसभा निवडणूकीसंदर्भात जागा वाटपाची चर्चा सुरु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *