मुंबई: प्रतिनिधी
गोरेगावच्या नॅस्को सेंटर /बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे रोज दहा हजार स्थलांतरित कामगारांना जेवण दिले जात असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. मात्र स्थानिक नगरसेवक पंकज यादव आणि भाजपाचे प्रदेश सचिव संजय उपाध्याय यांनी या स्थलांतरीत कामगारांच्या शिबीरास भेट दिली असता हे शिबीरच रिकामे असल्याचे दिसून असून या ठिकाणी एकही कामगार पोहोचला नसल्याचे दिसून आल्याने हा खर्च नेमका कशासाठी सुरु असल्याचा सवाल भाजपाचे प्रदेश सचिव संजय उपाध्याय यांनी केला.
मुंबईत ठिकठिकाणी स्थलांतरित कामगार राहात असून अनेकजण रस्त्यांवरच राहातात. बहुतांश कुटुंबाविना एकटेच असतात. त्यांना या शिबिरात एकत्र करून लॉकडाऊन काळात त्यांच्या भोजन, निवास आणि वैद्यकीय तपासणीची व्यवस्था तातडीने केली जावी असी मागणी करत अन्यथा हे होणार नसेल तर हा वाया जाणारा खर्च बंद करून तो इतर ठिकाणच्या सुविधांसाठी करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
या शिबिराबद्दल सरकारने खोटी माहिती का दिली असा सवालही त्यांनी केला आहे. अशा किती ठिकाणी सरकारी पैसा वाया चालला आहे, याची तातडीने शासनाने चौकशी करावी अशी मागणी करत रेशनवरचे धान्य जे केंद्राने पुरवले आहे तेही अद्याप वाटले गेलेले नाही. केंद्राने मोफत वाटण्यासाठी दिलेले धान्याची विक्री करण्याचा शासनाचा निर्णय दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त करत सरकारने ज्या घोषणा केल्या त्या तरी नीट पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात नँस्को सेंटर-बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमधील कामगारांना जेवण वाटपाची जबाबदारी सोपविण्यात आलेले अधिकारी अतुल कुलकर्णी यांच्याशी सतत मोबाईल आणि एसएमएसच्या माध्यमातून सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता (बातमी प्रसिध्द होईपर्यत) त्यांचा मोबाईल फोन सारखा स्वीच येत होता.