Breaking News

महिला अत्याचांरामध्ये भाजपाशासित राज्येच आघाडीवर फडणवीस सरकारच महिलांसाठी कर्दनकाळ ठरले-सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी

महिला अत्याचारांमध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेश आघाडीवर असल्याचे आत्ताच घोषित झालेल्या NCRB २०२० च्या आकडेवारीनुसार स्पष्ट दिसत आहे. तर मविआ सरकारच्या काळात मात्र महाराष्ट्रील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपाच्या राज्यांतील महिला अत्याचारांवरील चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीला तेथील महिलांचीही काळजी असल्याने अनुमोदन आहे. महिला विरोधी भाजपानेही या मागणीला पाठिंबा द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत फडणवीस सरकार हे महाराष्ट्रातील महिलांसाठी कर्दनकाळ ठरले होते अशी टीका करत त्याची आठवण करून दिली

महिला अत्याचारांमध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेश पुन्हा आघाडीवर असून आसाम, मध्यप्रदेश, हरयाणा, कर्नाटक या भाजपच्या राज्यातही महिला अत्याचाराचे मोठे प्रमाण आहे. आसाममध्ये सर्वाधिक प्रति लक्ष १५४ महिला अत्याचार झाले. गँगरेप, मर्डरच्या घटनांमध्ये ही उत्तर प्रदेश पुढे आहे. त्यानंतर भाजपा शासित मध्यप्रदेश व आसाम येतात.

महिला अत्याचारांमध्ये भाजपा शासित राज्यात बेसुमार अत्याचार होत असतानाही राज्यातील भाजपा नेत्यांकडून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यांना माहीत असण्याची आवश्यकता आहे की, फडणवीसांच्या काळात गँगरेप व मर्डर च्या ४७ घटना घडल्याने २०१९ ला महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक होता. फडणवीसांच्या तथाकथित रामराज्यात २०१५ साली ३१२१६ घटना, २०१६ साली ३१३८८ घटना, २०१७ साली ३१९७८ घटना, २०१८ साली ३५४९७ घटना तर २०१९ साली ३७१४४ महिलांवर अत्याचार झाले. फडणवीस सरकार हे महिलांसाठी कर्दनकाळ ठरले होते असा आरोपही त्यांनी केला.

मात्र महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या काळात २०२० ला त्यात घट होऊन महिला अत्याचारांची संख्या ३१९५४ झाली. तर गँगरेप व मर्डर च्या २० घटना झाल्या ज्या फडणवीस सरकारच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे सांगत हे आकडे पाहता उद्धव ठाकरे यांनी देशातील विशेषतः भाजपाच्या राज्यांतील महिला अत्याचारांवर चर्चेसाठी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीला संघ विचारधारेतून महिला विरोधी बनलेल्या भाजपाने पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

महिला अत्याचाराच्या प्रश्नावर विधिमंडळाचे २ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे या भाजपाच्या मागणीला उचलून धरत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी देशातील महिलांचा विचार करत संसदेचे ४ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे तीच योग्यच असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *