नागपूर : प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक महत्वाच्या प्रश्नावर कॉंग्रस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षांच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चाची सुरुवात नागपूर येथील दिक्षाभूमीवरून सुरुवात झाली. या मोर्चामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह अनेक वरीष्ठ नेते सहभागी झाले होते. या मोर्चात शेकाप, आरपीआय (कवाडे) गट, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्त्येही सहभागी झाले.
मागील तीन वर्षापासून राज्यात भाजप-शिवसेनेच्या विरोधात राजकिय वातावरण निर्मिती करण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत अपयश येत होते. परंतु राज्य सरकारच्या विरोधात पुकारलेल्या या मोर्चाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून नागपूरमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चातही नागरीक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. मोर्चामध्ये राज्य सरकारच्या विरोधात लिहीलेले फलक सहभागी मोर्चेकऱ्यांच्या हातात होते. मोर्चेकऱ्यांकडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात येत होत्या.
विशेष म्हणजे हा मोर्चा दुपारी १२ च्या सुमारास निघूनही मोर्चेकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसत होता. त्याचबरोबर मोर्चामुळे संपूर्ण नागपूर शहर हे हल्लाबोल मोर्चामय बनल्याचे ठिकठिकाणी जाणवत होते.
गेल्याकाही वर्षांमध्ये नागपूर हा भाजपचा गड मानला जात असल्याने येथे पुन्हा एकदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पाय रोवता येणे कठीण मानले जात होते. मात्र या हल्लाबोल मोर्चाला मिळत असलेल्या प्रतिसादावरून नागपूर आणि विदर्भात पुन्हा एकदा कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आशेचा किरण निर्माण झालेला आहे.