मुंबई : प्रतिनिधी
वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस, डाव्या पक्षांसह विविध पक्षांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला सकाळपासूनच सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी अंधेरी येथील रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन सुरु केले. यामुळे पोलिसांनी या सर्वांना अटक करून डी.एन.नगर पोलिस स्थानकात नेले.
भारत बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह अनेक आजी-माजी आमदारांनी माहिम ते अंधेरी असा लोकलने प्रवास केला.
यावेळी अंधेरी स्थानकात उपस्थित असलेले अनेक कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि वाढत्या महागाईच्या विरोधात घोषणाबाजी करत रेल्वे वाहतूक रोखून धरली. काही काळानंतर पोलिसांनी या सर्व नेत्यांना अटक करून डी.एन.नगर पोलिस स्टेशनला नेले.
भारत बंद यशस्वीतेसाठी मनसे आक्रमक
काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनास मनसेने पाठिंबा जाहीर केला. मुंबत सकाळपासूनच चेंबूर, नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद करण्यासाठी मनसैनिक उतरले. चेंबूर येथे ट्रेलर रस्त्यात आडवा उभा करून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. तर दिंडोशी-गोरेगांव येथेही मनसे कार्यकर्त्ये रस्त्यावर उतरून वाहन चालकांना, दुकानदारांना बंद असल्याचे सांगत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे सांगत होते.