Breaking News

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या या मागण्या बुडणाऱ्या रोजगाराची नुकसान भरपाई लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करा

कराड : प्रतिनिधी

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२० मध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत. विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची ही दुसरी लाट (?) मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन करावे की कसे यावर प्रशासन, वैद्यकीय तज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनता यांमधून वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. महाराष्ट्रात उद्योजक असो किंवा वैद्यकीय तज्ञ प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांडू शकतो ही आश्वासक बाब असली तरीदेखील शासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे. परंतु लॉकडाऊन लागू करणार असाल तर बुडणाऱ्या रोजगाराची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करावी अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

परिणामी राज्य पातळीवर लॉकडाऊनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

  • लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना देणे.
  • लॉकडाऊनचा कालावधी कमीत-कमी ठेवणे.
  • या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करणे (पाश्चिमात्य  देशांप्रमाणे). यासाठी प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करणे.
  • खाजगी वाहनातून प्रवासास मुभा देणे.
  • शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालु ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ न देणे.
  • लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढवणे.

आदी मागण्याही त्यांनी राज्य सरकारकडे केल्या.

केंद्र सरकारने गेली वर्षी मार्च मध्ये अचानकपणे कोणतेही नियोजन न करता लॉकडाउन घोषित केले होते. सारासार विचार न करता घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला व भारतातील ३ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल आणि कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यास मदत ठरेल अशा प्रकारे लॉकडाऊनचे नियोजन करणे आवश्यक असल्याची सूचनाही त्यांनी केली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *