मुंबई : प्रतिनिधी
केंद्रातील भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिके आणि कारभारामुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कारभाराच्या निषेधार्थ आणि देशात शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे उद्या ९ एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.
या एक दिवसीय उपोषणात ते स्वत:ही परभणी येथे उपोषणाला बसणार असून राज्यभरातील सर्व कॉंग्रेसच्या मुख्यालयात तेथील पदाधिकारी एक दिवसीय उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये सांगितले.
विशेष म्हणजे या एक दिवसीय उपोषणात प्रत्येक आमदार त्यांच्या स्थानिक काँग्रेस मुख्यालयाऐवजी दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपोषण करणार आहे. नांदेडचे अशोक चव्हाण असले तरी ते परभणीत उपोषण करणार आहेत. तर विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे अहमदनगरऐवजी नाशिक येथे उपोषणाला बसणार आहेत.