मुंबई: प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. तिथले स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणूका होणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी – शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढविण्याची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे वृत्त आले. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूकीत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार असल्याच्या चर्चांही चांगल्याच रंगल्या होत्या. अखेर या सर्व चर्चांवर पडदा टाकत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढविण्याची भूमिका महाविकास आघाडीतील पक्षांची नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आगामी निवडणूकांमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले. तसेच हे तिन्ही पक्ष आपल्याच मित्र पक्षांबरोबरच भाजपाशीही लढत देणार आहेत.
त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये चांगलीच रंगत येणार असल्याचे चित्र निर्माण झाले.