Breaking News

उध्दव ठाकरें म्हणाले, शिडी करून पोहोचलेल्यांपासून हिंदूत्वाला धोका दसरा मेळाव्यात पंतप्रधान मोदींसह भाजपावर सोडले तोफगोळे

मुंबई: विशेष प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी कोणी तरी माहिती अधिकारात केंद्रीय गृह मंत्रालयाकडे विचारणा केली की, हिंदूंना धोका आहे का? म्हणून परंतु गृह मंत्रालयालयाने उत्तर दिले की असे काही नाही म्हणून. मग हिंदूना धोका नाही तर मग कोणापासून धोका आहे तर तो म्हणजे ज्यांनी हिंदूत्वाची शिडी करून जे सत्तेवर पोहोचले त्यांच्यापासूनच खरा हिंदूना धोका हा परकीयांपासून नव्हे तर हे नव्याने आलेल्या उपटसुंभ हिंदूत्वामुळे धोका असल्याची खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर केली.

षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

मागील वेळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत. मग देशातील शेतकऱ्यांचे येथील वंचित, अस्पृश्यांचे पूर्वज काय परग्रहांवरून आले होते का? त्यांच्याशी बोलायला देशाच्या प्रमुखाला वेळ मिळत नाही, परवा लखीमपूरमध्ये झाले त्यांचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का? ज्याने हे कृत्य केले तो मंत्री काय परग्रहावरून आला होते का? असा उपरोधिक सवाल पंतप्रधान मोदींना करत परवा स्वा.सावरकर यांच्यावरून कोणीतरी बोलून गेले. अरे तुमची लायकी तरी आहे का? असा उपरोधिक सवाल करत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कोणताही सहभाग नाही त्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल आदरभाव नाही काही नाही आणि त्यांच्या नावाचा उल्लेख करताय. स्वातंत्र्य लढ्यात काय भोगलं, काय वाटतं त्याबद्दल स्वत: गांधी बोलतील, स्वा.सावरकर बोलतील. तुम्ही बोलणारे कोण असा सवाल करत यांचे हिंदूत्व म्हणूजे माय मरो आणि गाय वाचो अशा पध्दतीचे आहे. असले हिंदूत्व शेंडी जाणव्याचे आमचे कधीच नव्हते आणि नाही असे ते म्हणाले.

त्याचबरोबर मोहन भागवत यांनी सांगितले की हिंदू म्हणजे कोण? आमचं हिंदूत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी हिच शिकवण दिली. मात्र आम्ही जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा कसलं तरी हिंदूत्वावरून आमच्या आडवं याल तर आम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही. या देशात राहणारे सर्वचजण हिंदू मग हे कोण? असा भाजपाचे नाव न घेता उल्लेख करत मग कोणाला हिंदूत्व शिकवायचे, हे लोक लिंचिंक करणार मग यांना हिंदू कसे म्हणायचे असा सवालही त्यांनी यावेळी केला.

यांचे हिंदूत्व म्हणजे भारत माता की जय, वंदे मातरम् म्हणण्या इतकेच असून हिंदूत्वाची शिडीकरून तेथे बसलेले आता सत्तेसाठी ब्रिटीशांची फोडा आणि झोडा ही नीती वापरून स्वत:च्या सत्तेचे आसन मजबूत करत असल्याची टीकाही त्यांनी मोदी सरकारवर केली.

मै तो क्या फकिर हूँ झोला असेल झोला वगैरे कर्मदरीद्री शब्द आमच्या शब्द कोशात नाहीत असे सांगत पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल मुख्यमंत्री ठाकरे यांनी चढविला. मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून सरकार पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. मी हे फक्त पद स्विकारले नाही तर जबाबदारी स्विकारली आहे. मी सत्तेसाठी हे पद स्विकारले नसल्याचे सांगत काहीजण आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय असे म्हणत होते. होय तुम्हीच मुख्यमंत्री आजही राहीला असतात. जर तुम्ही शिवसेनेला दिलेला शब्द मोडला नसता तर. तुम्ही विश्वासघात केलात म्हणून आज तुम्ही मुख्यमंत्री नाही असे देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली.

शिवसेनेला दिलेला शब्द पाळला असतात तर आज मी राजकारणातून बाजूला झालो असतो पण तुमच्या विश्वासघामुळे मला जबाबदारी घ्यावी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यांना या राज्यात सत्ता हवीय त्या राज्यात सत्ता हवीय हे ही एक अंमली व्यसन असून या व्यसनातूनच त्यांच्याकडून कुटुंब उध्दवस्त करण्याचे काम केंद्रातील सत्ताधारी करत आहेत. तुमच्या इच्छेसाठी तुम्ही दुसऱ्यांची घरे उध्दवस्त करत आहात का? असा सवाल करत तुम्हाला जर आव्हानच द्यायचं असेल तर ईडी, फिडी, इन्कम टॅक्सच्या धाडींचा वापर न करता मैदानात येवून थेट आव्हान द्या ना असे आव्हानच त्यांनी विरोधकांना देत आव्हान देवून पोलिसांच्या मागे लपणाऱ्याला नामर्द म्हणतात अशी खोचक टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.

राज्याचे पोलिस कोट्यावधींचे ड्रग्ज पकडले तसेच त्याचा व्यापार करणाऱ्यावर कारवाईही केली. मात्र काहीजण ग्रॅमचे ड्रग्ज पकडून कोणावर तरी बड्या व्यक्तीवर कारवाई करत असल्याचे दाखवित आहेत. त्या कोणत्या मुलाला मी पकडले म्हणून बोलत नाही. अडाणीचे मुंद्रा बंदर कोठे आहे? तेथे जी काही हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले त्याचे काय झाले. त्याची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. इथे राज्याचे पोलिस स्वत:हून कारवाई करत आहेत. केवळ राज्यातील सत्ता मिळावी म्हणून आणि चीनमधून बाहेर पडणाऱ्या अनेक कंपन्या आपण महाराष्ट्रात आणत असल्याने केवळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम विरोधकांकडून करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर करत अरे तुम्हाला सत्ता पाहिजे ना देतो मी सत्ता पण माझ्या महाराष्ट्राला बदनाम करू नका असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

आज देशातील सर्वाधिक निधी एकट्या गुजरातला दिला जात आहे. हा अहवाल माझा नाही तर कॅनने दिला असून ११ राज्यांचा ३५ टक्क्याहून अधिक निधी गुजरातला दिला आहे. मग महाराष्ट्राला काय शेजारच्या तामीळनाडूचे काय, केरळचे काय असा सवाल करत केंद्र सरकार आता राज्यांच्या अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ करत असल्याचा गंभीर आरोप करत आपण जी काही राज्यातील कोविडची लढाई लढत आहोत ती केवळ न केवळ फक्त तुमच्या-आमच्या घामातून दिलेल्या पैशातून लढत असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांनी जे करून दाखवले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत राज्यातही बंगालसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून जे कोणी तलवारी, चाकू घेवून येतील त्यांची शस्त्रे मोडून तोडून त्यांना हद्दपार करण्यासाठी आपल्याला लढावे लागणार असून आपल्याला एकहाती सत्ता आणण्यासाठी झगडावं लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्याकडे दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नवरात्री सारखे चांगले सण आहेत. तसेच शिमगाही आहे. मात्र शिमगा आल्यावर आपण शिमगा सण साजरा करतो. मात्र विरोधकांकडे कायम शिमगा असतो. त्यांना मध्यंतरी शिमगा करू दिला नाही म्हणून त्यांनी राज्याच्या पोलिसांना माफिया म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मग उत्तर प्रदेशाच्या पोलिसांनी जे लखीमपूर येथे घडले, अखिलेश यादव, प्रियंका गांधी-वड्रा सोबत जे केले ते काय भारतभूषण की भारत रत्न आहेत असा खोचक टीकाही त्यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच धारावी झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्प राबविणार असल्याचे सांगत या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे वित्तीय केंद्रही उभारणार असल्याची घोषणा करत मुंबईत लष्करी संग्रहालय उभारण्यात येणार असून या ठिकाणी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या प्रत्यक्ष परिस्थितीप्रमाणे काश्मीर, राजस्थानमधील वाटळवंटातील परिस्थितीसारखी परिस्थिती निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्याला शिवसेना पुन्हा बळकट करण्यासाठी मराठी-अमराठी असा वाद, हा स्पृश्य-अस्पृश्य, ९६ कुळी मराठा, ९२ कुळी मराठा असा भेद करून चालणार नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणूस म्हणून आपल्याला एक व्हावचं लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

दिपक केसरकर यांची घोषणा, शाळेत जाणाऱ्या शिक्षकांसाठीही ड्रेस कोड

येत्या शैक्षणिक सत्रापासून राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठीही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. पुरुष शिक्षकांना शर्ट आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *