मुंबई: प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्धल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली तसेच या कृतीचा तीव्र निषेधही करण्यात आला. सदरहू प्रकरण खूप गंभीर असून केंद्र सरकारने देखील याची तातडीने दखल घ्यावी व यामागे जे कुणी असतील त्यांना शोधून कठोर शासन करावे अशा तीव्र भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला आहे अशी माहिती दिली.
काल रात्री २ वाजता मातोश्रीवर अज्ञात व्यक्तीने फोन करून मातोश्री उडवून देण्याची धमकी दिली. सदरचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहिम हाती घेत मातोश्री भोवती कडेकोड पोलिस फौज तैनात करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.