Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंचे संकेत तर टोपेंकडून थेट वेळाच जाहिर राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : विशेष प्रतिनिधी
मागील काही महिन्यापासून राज्यात कोरोना बाधित आढळून येण्याच्या संख्येत चांगलीच घट होताना दिसत आहे. तसेच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे, उपाहरागृहे, दुकानांच्या वेळात वाढ करण्याचे संकेत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. मात्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थेट वेळाच जाहिर करत दुकानांच्या वेळा रात्री ११ पर्यंत तर हॉटेलच्या वेळा १२ आणि शेवटची ऑर्डर रात्री १ वाजेपर्यंत घेता येणार असल्याचे जाहिर करत मुख्यमंत्र्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वी नवरात्रोस्तव सुरु होण्यापूर्वीही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबई वगळता राज्यात गरबा खेळण्यास परवानगी देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने गरबा खेळण्यास थेट मनाईच केली. त्यामुळे राज्यात निर्बंधातून कधी सूट द्यायची आणि कधी नाही, लॉकडाऊन कधी जाहिर करायचा कधी नाही याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याची कबुली दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिरपणे दिली असताना त्यांच्याच पक्षाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे मात्र वारंवार मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करत असल्याने वेगळाच संदेश जात असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु झाली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज घेतलेल्या टास्कफोर्ससोबत घेतलेल्या बैठकीत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले.
वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील २२ ऑक्टोबर पासून सुरू होतील.
कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्णसंख्या कमी होतांना दिसते आहे. २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहेही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांची देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास दिल्या.
दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी.
कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक डॉ दिलीप म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका उपायुक्त सुरेश काकाणी, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ खुसराव्ह, डॉ अजित देसाई, डॉ सुहास प्रभू आदी उपस्थित होते.

Check Also

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे’ उद्घाटन

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातंर्गत उभारण्यात आलेला मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष हे कायद्यातील नवीन संहितेला अनुसरून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *