Breaking News

मुख्यमंत्री म्हणाले की, लस घेतल्यानंतरही कोरोना होतो पंतप्रधानांनी बैठकीत सांगितल्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात कोरोनाला रोखण्याचा भाग म्हणून जरी लसीकरणाची मोहिम राबविण्यात येत असली तरी लस घेतल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याची माहिती दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केला.

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करायचा कि कडक निर्बंध याप्रश्नी राज्यातील जनतेशी ते समाजमाध्यमातून संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

लसीकरण झालेल्या व्यक्तींना कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. परंतु सदर व्यक्तीने लस घेतल्याने त्यास फारसा त्रास किंवा घातक ठरत नाही. परंतु त्या व्यक्तीमुळे इतरांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. तसेच हि बाब सिध्दही झालेली असल्याने लस घेतली असली तरी मास्क वापरणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मास्क वापरल्याने, हातांना सॅनिटायझ करणे आणि सोशल डिस्टंसिंग हाच कोरोनाला रोखण्याला पर्याय असल्याने लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, गर्दीची ठिकाणे टाळावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या या खुलाशामुळे आता कोरोनाची लस घेतलेले व्यक्तीही पुरेशी काळजी घेतील आणि आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करतील अशी अपेक्षा आहे. मात्र कोरोनाची लस घेवूनही जर कोरोना विषाणूची लागण होत असेल तर कोरोनाची लस या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच सद्य परिस्थितीत ज्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली नाही असे व्यक्ती कोरोनाची लस घेण्याचे टाळत आहेत. लस घेतल्यानंतरही जर कोरोना होत असेल तर लसच घ्यायला नको असेही काहीजण आपले मत व्यक्त करत आहेत.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *