Breaking News

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मला आर्शिवाद द्या, आर्शिवाद द्या म्हणून कोणी देत नसते…. आंदोलन करायचे असेल तर सरकार विरोधात नव्हेतर कोरोना विरोधात करा-ऑक्सीजन प्लांटचा लोकार्पण सोहळा

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे असा टोला भाजपाला लगावत हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. मागील काही दिवसांमध्ये काही जण मला आर्शिवाद द्या, आर्शिवाद द्या म्हणून फिरत होते. मात्र असे मागून कोणी आर्शिवाद देत नसते. त्यासाठी लोकांची कामे करावी लागतात अशी उपरोधिक टीकाही त्यांनी भाजपा आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.

ठाणे येथील कायम स्वरूपी ऑक्सीजन प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण करतेवेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोरोना हा काही मोफत वाटपाचा सरकारी कार्यक्रम नाही, त्यामुळे कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल. दहिहंडी आणि आगामी गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या स्थानिक स्तरावर निर्बंध लागू करा असे पत्रच केंद्र सरकारने राज्याला पाठविले आहे. त्यानुसार राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने दहिहंडीला परवानगी नाकारली आहे. यापार्श्वभूमीवर खरे हिंदू विरोधी कोण हे आता तुम्हीच ठरवा असा खोचक टोलाही त्यांनी भाजपा आणि मनसेला लगावला.

तुम्ही ज्या पध्दतीने दहिदंडी उत्सवाला, मंदीर उघडण्यासाठी परवानगी नाकारली म्हणून सरकारच्या विरोधात करता. मात्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही कोरोना विरोधात करा असे आवाहन करत कोरोनाच्या विरोधातील आंदोलनाचा भाग म्हणून अॅम्ब्युलन्सचे वाटप करा, प्राणवायूचे प्लॅंट उभारा त्या आंदोलनाची सरकारकडून निश्चित दखल घेवू असेही ते म्हणाले.

मला शिवसैनिकांचा सार्थ अभिमान आहे. शिवसेनेचे आमदार असलेल्या प्रताप सरनाईक यांनी या कोरोना विरोधी आंदोलनाचा भाग म्हणून त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते, आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. सरनाईक यांनी अनेक अॅम्ब्युलन्सचे आज लोकांच्या सेवेसाठी दिल्याचे सांगत सारखा निधी मागत जावू नका अशी प्रेमळ सूचना देत निधी हा दिलास पाहिजेच चांगल्या कामासाठी निधी हा दिलाच पाहिजे. त्यातूनच लोक हिताची कामे होत असतात असेही त्यांनी सांगितले.

दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची ओळख. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे एक वेगळं नातं आहे.  त्यामुळेच शिवसेनेबद्दल लोकांना, ठाणेकरांना वाटणारा विश्वास आजही कायम असल्याचे सांगत हे नाते टिकवले पाहिजे पण दुर्देवाने आज १०० टक्के राजकारण केले जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे.  त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे असे सांगत दहिहंडीचा उत्सव साजरा करणाऱ्या मनसेला आणि भाजपा नेत्यांना कान पिचक्या दिल्या.

आज प्रताप सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करताहेत, तसे करण्याची गरज आहे पण दुर्देवाने तेवढी प्रगल्भता इतर काही लोकांमध्ये दिसत नाही. आपल्या बेशिस्त वागणूकीतून ते शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवन ही अडचणीत आणत आहेत असल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *