मुंबई : प्रतिनिधी
राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात थोडेसे बाजूला फेकल्या गेलेल्या आणि ईडींच्या कारवाईमुळे त्रस्त झालेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे आज मुख्यमंत्र्याननी कौतुक करत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच नाईक यांना यापुढेही निधी देवू असे सांगत सेना अंतर्गत राजकारणात नाईक हे डावलले जाणार नसल्याचे एकप्रकारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात कळत नकळत शिंदे गटात आणि प्रताप सरनाईक यांच्यात राजकिय दुरावा वाढू लागला. त्यामुळे यासंदर्भातील तक्रारही ते शिवसेनेतील बड्या नेत्यांच्या कानावर घालत होते. मात्र त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय काही केल्या दूर होत नव्हता. त्यातच विधानसभेत अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात ठराव आणल्यानंतर ईडीकडून त्यांच्यावर कारवाईस सुरुवात झाली. या कारवाईमुळे त्रस्त होवून सरनाईक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना एक पत्र लिहीत भाजपाबरोबर जुळवून घेण्याचे आवाहन केले.
त्यातच प्रताप सरनाईक यांच्यावर मीरा भाईंदरसह पश्चिम उपनगरातील अनेक शहरांची जबाबदारी सोपविण्यात आली. तरीही सरनाईक यांनी सुचविलेल्या अनेक विकास कामांना राज्य सरकारकडून निधी मिळेनासा झाल्याने ते काहीसे नाराज आणि ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात बाजूला फेकल्या गेल्याचे दिसून येत होते. परंतु आज झालेल्या ऑक्सीजन प्लांट लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनीच सरनाईक यांना आता निधी मिळाला नाही म्हणून सारखे म्हणायचे नाही असे सांगत चांगल्या कामासाठी निधी मिळायलाच हवा असे सांगत “एकनाथ” चांगल्या कामासाठी नेहमीच निधी मिळाला आहे येथून पुढेही निधी देवू याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच अनेकजण तारीख पे तारीख जाहीर करतात, प्रत्यक्षात काही करत नाहीत पण पंधरा दिवसापूर्वी तारीख ठरवून जनतेचे प्राण वाचवण्यासाठी प्राणवायूचा प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आमदार प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन केले.
यावेळी प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत नेहमी मला ऑक्सीजन देतात आता यापुढे इंतरांना ऑक्सीजन पुरवठा करत असल्याचे सांगत मी सगळ्यांना आॉक्सीजन पुरवठा करतो. मात्र मला संजय राऊत ऑक्सीजन देतात असे सांगत राऊत यांच्या मदतीचा आणि मार्गदर्शनाचा उल्लेख करत आभार मानले.