Breaking News

घरे पेटवणं सोपं, पण चूल पेटली पाहिजे उद्योजक, शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची मुख्यमंत्री ठाकरेंची ग्वाही

औरंगाबाद: प्रतिनिधी
राज्यातील गोरगरीब जनतेच्या दैंनदिन समस्या अनेक आहेत. घरे पेटवणं सोपं असतं पण गोरगरीबांच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे असे सांगत अनेक राजकिय अडचणींवर मात करून हे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून या शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करायचं असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला.
व्यक्त राज्याच्या औद्योगिक विकासाव्दारे उद्योजक आणि शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद बिडकीन येथे पाचशे एकर जमीनीवर ‘अन्न प्रक्रिया केंद्र’ उभारणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.
औरंगाबाद कलाग्राम, गरवारे संकुल परिसर येथे मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (मसिआ) यांच्याव्दारे आयोजित चार दिवसीय ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो’ या औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
शेतकरी आणि उद्योजक यांच्या कष्टाला, दुर्दम्य इच्छाशक्तीला शासनाच्या कृतीशील प्रयत्नाची भक्कम साथ देण्याचा शासनाचा मानस आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करत असतानाच आता शेतकरी हा चिंतामुक्त करण्याची शासनाची भूमिका आहे. उद्योग विकासाव्दारे येथील शेतकरी, भूमीपुत्रांना रोजगारसंधी देण्यास, उद्योजकांना सक्षम करण्यास शासनाचे प्रथम प्राधान्य राहणार असून उद्योग आणि कृषी या दोन विभागांच्या समन्वयातून अन्नप्रक्रिया, तेलबिया प्रक्रिया यासारख्या शेतमालाशी निगडीत अन्नधान्य प्रक्रिया उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बिडकीन येथील पाचशे एकर जमिनीवरील अन्न प्रक्रिया केंद्राचे लवकरच भूमीपूजन करून गतीने केंद्र उभारणीचे काम पूर्ण केले जाईल. तसेच या ठिकाणी 100 एकर जमीन ही महिला उद्योजकांसाठी राखीव असणार आहे. मराठवाड्यात उद्योगक्षेत्रात भरीव काम होत असून उद्योग विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य शासनस्तरावरून उपलब्ध करून दिले जाईल, असेही ते म्हणाले.
सोबतच राज्यात नवनवीन उद्योगसमूह, व्यवसाय संधी विस्तारणार आहे. त्यासाठीचे तयार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच शेंद्रा येथे कौशल्य विकास संकुलदेखील उभारणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची क्षमता महाराष्ट्रातील मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रात आहे. पारंपरिक उद्योग व्यवसायाच्या पुढे जात वेगळा आधुनिक प्रयोग करून जगाला मेड इन इंडीयाची ओळख आपण करून देऊ शकतो हा विश्वास देणारे काम मराठवाड्यात होत आहे. मराठवाड्याची ही औद्योगिक ताकत दाखवणारे हे प्रदर्शन असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले.
आपल्या सगळ्यांना दोन घास देणाऱ्या शेतकऱ्याला हवामानाच्या लहरीपणामुळे खूप समस्यांना, अस्थिरतेला सामोरे जावे लागत आहे. त्याला आधार देण्यासाठी, भूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी शासन उद्योग विकासाला भरीव चालना देणार आहे. त्यातुन भूमीपुत्रांना रोजगार देणे आणि उद्योगक्षेत्राचा झपाट्याने विकास करणे शक्य होईल अशी आशा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, कृषी, जल, उद्योगक्षेत्राच्या समस्या दूर करून राज्याला गतीने पुढे नेण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धार आहे. मराठवाड्याचे, राज्याचे औद्योगिक क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातून अधिक समृद्ध होईल. त्यादृष्टीने मराठवाड्याच्या व्यापक प्रगतीसाठी येथे औद्योगिक विकासाला प्राधान्य देण्यात येत असून लवकरच औरंगाबाद येथे अतिरीक्त शेंद्रा औद्योगिक वसाहत 1 हजार हेक्टर क्षेत्रावर सुरू करणार आहोत. जालना, उस्मानाबाद, नांदेड येथील उद्योग विस्तारासाठीच्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामालाही अधिक गतिमान करण्यात येणार आहे. कापसावर आधारीत उद्योग व्यवसाय विस्तारण्यासाठी कापसाची दरवाढ करणार असून उस्मानाबाद येथे टेक्नीकल हब सुरू करणार आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नवीन उद्योग येणार आहे. त्या माध्यमातून 8 हजार 360 कोटी रूपयांची नवीन गुंतवणूक येणार आहे. तसेच उद्योजकांना सेवाशुल्काचा भार वाटणार नाही या पद्धतीने तो कमी केला आहे.
यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री तथा औरंगाबाद जिल्हा पालकमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा व स्वच्छता, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, खा. इम्तियाज जलील, खा. राजकुमार धुत, आमदार सर्वश्री हरीभाऊ बागडे, अतुल सावे, प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, अंबादास दानवे, संजय सिरसाट, सतिश चव्हाण, विक्रम काळे, उदयसिंह राजपुत, प्रा. रमेश बोरनारे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भुषण गगराणी, विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनात साडेचारशेवर उद्योजकांनी उत्पादने मांडली आहेत. औरंगाबाद, मराठवाड्यासह राज्य आणि देशभरातून सहभागी होणाऱ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री, इंजिनिअरिंग, ॲग्रीकल्चर आणि फूड प्रोसेसिंग, अॅनिमेशन, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल, ट्रेडिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, सेवा उद्योग स्वयंसेवी संस्था तसेच शैक्षणिक संस्थांची प्रदर्शनात विभागवार रचना करण्यात आलेली आहे. अनेक मोठ्या उद्योगांबरोबरच मध्यम आणि नवोदित उद्योजकही सहभागी झाले आहेत.

Check Also

एक्सने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात इतकी खाती केली बंद नवी माहिती आली पुढे

इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील एक्स X कॉर्पने एका महिन्याच्या कालावधीत तब्बल २१२,६२७ खात्यांवर बंदी घालून, बाल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *