मुंबईः प्रतिनिधी
आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवू, पुन्हा युतीचंच सरकार येणार, आता फक्त बहुमताचा विक्रम मोडीत काढायचा आहे. धाक किंवा प्रलोभनं दाखवून भाजपमध्ये प्रवेश दिलेले नाहीत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावत आम्ही आधी राधाकृष्ण विखेंना भाजपमध्ये घेतलं नाही, आधी सुजय विखेंना घेतलं, तसंच आधी वैभव पिचडांना घेतल्याने मधुकर पिचड सापडले, त्याशिवाय आधी रणजीतसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेतल्याने विजयसिंह मोहिते पाटील आपोआप आले. त्यामुळे संदीप नाईक आलेत. गणेश नाईकांचे आशीर्वाद त्यांच्यामागे कायम राहतील असे स्पष्ट करत आधी नेत्यांच्या मुलांना आम्ही पक्षात घेतल्याचे सांगत त्यानंतर नेते आपोआप आल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नेत्यांवर धाक किंवा प्रलोभने दाखवित राष्ट्रवादीतील नेत्यांना भाजपात घेत असल्याचा आरोप केला होता. त्यास मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने उत्तर देत खुलासा केला.
भाजपात होणाऱ्या पक्ष प्रवेशामुळे माध्यमात शिवसेना-भाजप वेगळं लढणार अशा बातम्या येत आहेत, आम्ही मित्रपक्ष मिळूनच निवडणूक लढू, महाराष्ट्रात युतीचेच सरकार येणार, बहुमताचा नवा विक्रम रचू असा विश्वास त्यांनी यावेळी केला.
यावेळी शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती, समरजीत घाटगे भाजपमध्ये यापूर्वीच आलेत, आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये दाखल झाले आहेत असं सांगत शिवेंद्रराजे भोसले यांचे स्वागत केले. तसेच मधुकर पिचड, कालिदास कोळंबकर यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्यांच्या भाजप प्रवेशाने अनुभवी नेत्यांची फळी दाखल झाली त्याचा फायदा पक्षाला होईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडत आहे व त्यासोबतच देश सक्षम होत आहे. त्यामुळे समाजातील सर्व थरातील जनतेचे भाजपाला समर्थन आहे. आपल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यात विकास पोहचवायचा असेल तर भाजपामध्ये गेले पाहिजे, याची नेत्यांना जाणीव झाली आहे. भाजपामध्ये प्रवेश करण्यास अनेकजण इच्छुक आहेत. पदाकरता नव्हे तर विकासासाठी विविध नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्षांची महायुती विजयी होईल. आपण उद्यापासून महाजनादेश यात्रेला जात असून महाराष्ट्रातील जनादेश महायुतीला मिळविण्यासाठी ही यात्रा आहे. महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी गेल्या पाच वर्षांत आणलेल्या योजना पूर्ण करायच्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजपा महायुती सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षांत झालेले महत्त्वाचे निर्णय आणि विकासकामे पाहून विविध पक्षांच्या नेत्यांची खात्री पटली आहे की, भाजपाच्या माध्यमातूनच आपल्या भागाचे विकासाचे प्रश्न सुटतील. आज भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांप्रमाणेच आणखी अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील. आपण आश्वस्त करतो की, भाजपामध्ये कोणताही दुजाभाव करण्यात येणार नाही व नेत्यांना त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे स्थान मिळेल. आपल्याला आपल्या भागाचा विकास करता येईल.
Tags ashish shelar bjp chandrakant patil cm fadnavis ncp sharad pawar sudhir mungantiwar
Check Also
नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …