मुंबईः प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दीही वाढत आहे. यापार्श्वभूमीवर मंत्रालयीन कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे दिसून येत असल्याने कोविड-१९ नियमावली पाळली जात नसल्याचे दिसून आल्याने मंत्रालयातील वाढता कोरोना प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने योग्य ते आवश्यक निर्णय घ्यावेत असे आदेश राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी एका आदेशान्वये सर्व विभागांना दिले.
१९ फेब्रुवारी २०२१ रोजी मंत्रालयात एकाच दिवसात ३५ कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली. यापार्श्वभूमीवर मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी कर्मचारी-अधिकाऱ्यांना एक दिवसा आड बोलाविणे, तीन दिवसांच्या शिफ्टवाईज कामावर बोलाविणे, आठवडाभराच्या शिफ्ट सुरु करणे आदी गोष्टींचा अवलंब करून मंत्रालयात संभावित होणारी गर्दी टाळणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत प्रत्येक विभागाच्या सचिवांनी याबाबत आवश्यक ते निर्णय घेवून कोरोनाचे नियम पाळून प्रादुर्भाव रोखावा असे आवाहनही त्यांनी केले.
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाला आळा घालण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बदल करण्याबाबतचे नियोजन करण्याबाबतचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच दिले. त्यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज पत्रक काढले. मात्र कार्यालयीन वेळेत बदल सुचविण्यात आलेले नसले तरी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीच्या अनुषंगाने आणि कामाच्या अनुषंगाने योग्य ते निर्णय प्रत्येक विभागाच्या सचिवांनी घ्यावेत असे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार कोणता विभाग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे नियोजन करतो यावरच आता तेथील कामाचे नियोजन ठरणार आहे.