मुंबई: प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून संचारबंदी जाहीर केली. तरीही संचारबंदीत अन्नधान्य, भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरीकांकडून गर्दी करण्यात येत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांना रेशनचे धान्य घरपोच पोहोचवण्यासाठी मुंबई छात्रभारतीचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणुन काम करायला तयार असल्याबाबतचे पत्र मुंबई छात्रभारती संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहीले आहे.
प्रति,
मा.ना.श्री.उध्दवजी ठाकरे,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
सस्नेह नमस्कार..
कोरोना संकटामुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेला महाविकास आघाडी सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य रेशनदुकानावर मोफत उपलब्ध करुन देण्याची सोय केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली असून या संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
लॉकडाऊनमध्ये गरीब आणि गरजू लोकांना अन्नधान्य घेण्यासाठी रेशन दुकाने गाठावी लागतील.नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सांगितलेल्या नियमांचे व सुचनांचे काटेकोर पालन होईलच असे नाही व त्यामुळे नागरिकांनाच घरपोच अन्नधान्य पुरविण्याची व्यवस्था शासनामार्फत राबिवली गेली पाहिजे. जेणेकरुन कमीत कमी लोकं बाहेर पडतील व कोरोनाला रोखण्याचे आव्हानात आपण सफल होऊत.
राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे मुंबईतील कार्यकर्ते नागरिकांना घरपोच अन्नधान्य पुरविण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करतील.अश्या प्रकारेच राज्यातील विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करुन आपण नागरिकांना घरपोच अन्नधान्य पोहचविण्याचा विचार करावा हि विनंती…
छात्रभारती विद्यार्थी संघटना राज्यशासनासोबत आहे आपला प्रतिसाद आल्यास आम्ही योग्य ती खबरदारी घेऊन स्वयंसेवक म्हणून काम करण्यास तयार आहोत..
आपला स्नेहांकित..
रोहित र. ढाले,अध्यक्ष
छात्रभारती विद्यार्थी संघटना मुंबई
8291503650