पुणे : प्रतिनिधी
राज्यातील एक मंत्री ईडीच्या रडार आहे, एक मंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा देवून बाहेर फिरतोय, एकजण करूणा मुंडे प्रकरणात मान खाली घालून फिरतोय, एका मंत्र्याबद्दल लूक ऑऊट नोटीस जारी झालीय, तर एकजण ईडी कारवाईपासून पळतोय, तर या सर्वांचे जे सगळं चालवितात त्या वाजेंद्र राऊतांचा बंगला पाडण्यात आला अरे हे मंत्रिमंडळ आहे की गुन्हे मंडळ आहे अशी खोचक टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दौऱ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना चार महिन्यात आरक्षण देण्याची घोषणा केली. पण मी एक महिना म्हणतो एका महिन्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली काढता येतो इतका हा विषय सोपा आहे. ओबीसींचे फक्त राजकिय आरक्षण गेलेले असून त्यासाठी फक्त इंम्पिरियल डेटा न्यायालयात सादर करायचा आहे. तो सादर केला की आरक्षण पुन्हा परत मिळेल. मात्र या सरकारला हे आरक्षण द्यायचे नाही. फक्त कोरोना आणि ओबीसींच्या नावाखाली त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका फक्त पुढे ढकलायच्या असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
संजय राऊत यांनी दिलेल्या आव्हानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, शरद पवारांनी कुणाच्या पाठीत खुपसला हे सगळ्या महाराष्ट्राला माहित असून फक्त शाळेच्या अभ्यासक्रमात तो धडा म्हणून येण्याचे बाकी राहिले असल्याचे सांगत आणीबाणीनंतरचा इतिहास जरा तपासून पहावा असा उपरोधिक टोलाही लगावला.
विश्वासघाताबद्दल आम्ही जे बोलतो. ते फक्त आमच्याशी विश्वासघात करणाऱ्या शिवसेनेबद्दल बोलत आहोत. आमचं राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल काहीही म्हणंण नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याशी कधी विश्वासघात केला नाही. तसेच आमचं म्हणण हे शिवसेनेच्या संजय राऊत यांच्याबद्दल आहे. त्यांची रोज सकाळी एक स्क्रिप्ट चालते. तीच स्क्रिप्ट दिवसभर चालते. मग काय आम्हालाही आता तुम्हीच स्क्रिप्ट देणार का? तीच वाचून आम्ही बोलायचे का? असा सवालही त्यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना यावेळी केला.
शिवसेने सोबत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन केलेली असली तरी राष्ट्रवादी शिवसेनेला हळुहळू खावून टाकत आहे. त्यांच्या ताब्यातील एक एक स्थानिक स्वराज्य संस्था खात आहे. इतकेच काय शिवसैनिकांना चांगल्या चांगल्या ऑफर देवून त्यांना राष्ट्रवादीत आणत आहे. नेतृत्व जरी शिवसेनेकडे असले तरी सगळ्या राज्यात राष्ट्रवादीच सरकार चालवित असल्याचा संदेश दिला जात आहे. काँग्रेस तर यांच्यात शिल्लकच राहीली नसल्याचे ते म्हणाले.
ज्या केंद्र सरकारच्या आधारे तुम्ही निर्बंध घालता त्याच केंद्र सराकरप्रमाणे राज्यातील जनतेला पॅकेज का देत नाही असा सवाल करत ते पुढे म्हणाले की, केंद्राने विधवांना १ हजार वाढीव अनुदान दिले, माणशी पाच किलो धान्य दिले तसे तुम्हीही करा. हा विषय मागील वेळेस मी राज्य सरकारने बोलाविलेल्या बैठकीत उपस्थित केला. त्यावेळी हाच मुद्दा उपस्थित केला. तेव्हा कुठे रिक्षावाल्यांसाठी कामगारांसाठी फुटकं १५०० रूपयांचं पॅकेज जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.
या सरकारकडून सत्तेचा प्रचंड गैरवापर करण्यात येत असून सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे. त्याशिवाय हे सरकार कोणत्याही गोष्टी सुरु करत नाही. कोरोना आणि इतर गोष्टींमुळे राज ठाकरे हे बोलत नव्हते मात्र आता तेही यासंदर्भात बोलत आहेत. त्यांचे बरोबर असल्याचेही त्यांनी सांगितले.