मुंबई: प्रतिनिधी
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सूडबुद्धीने घेतलेला असून राज्य सरकारच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारा आहे, अशी टीका भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhey) यांनी केली.
नुकतेच पोलिस प्रशासनाने राज्यातील नेत्यांच्या थ्रेट पर्सेप्शनचा आढावा घेतला. त्यात भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्यामुळे सरकारने भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपाने राज्य सरकारवर टीका केली.
उपाध्ये यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, महाआघाडी सरकारने या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. कोरोना काळात व त्याआधीही देवेंद्र फडणवीस हे राज्यभर हिंडून जनतेला दिलासा देण्याचे काम करत होते. त्या काळात मुख्यमंत्री घरात बसून होते. भंडारा येथेही फडणवीस हेच सर्वप्रथम धावून गेले. राज्य सरकारने या नेत्यांची पूर्ण सुरक्षा काढून घेतली तरी ते जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम करतच राहतील असल्याचा इशारा दिला.