मुंबई : प्रतिनिधी
राज्यात कडक निर्बंध लागू करून अत्यावश्यक सेवेतील दुकांनातील वस्तु खरेदीच्या नावाखाली रस्त्यावर फिरताना आढूळ येत आहेत. तसेच दुकांनावर खरेदीच्या निमित्ताने गर्दीही करत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी त्याची साखळी वाढतच असल्याने राज्य सरकारने नव्याने निर्बंध लादत हॉटेल-रेस्टॉरंट वगळता अत्यावश्यक सेवेतील दुकांनाच्या वेळेचे बंधन घातले आहे. यासंबधीचे आदेश ब्रेक द चेन अंतर्गत नव्याने जारी करण्यात आले.
या नव्या आदेशान्वये सर्व अन्न व धान्याची दुकाने, किराणा दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळांची दुकाने, दुधाच्या डेअरी, बेकरी दुकाने, मटन-चिकन-अंडी-मासे-पोल्ट्री दुकाने, कृषी विषयक दुकाने, कुत्र्यांच्या खाद्यान्नाची दुकाने आणि पावसाळी वस्तुंच्या विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ या कालावधीतच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून त्यानंतर ही दुकाने सुरु ठेवण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
तर याशिवाय ही वरील दुकाने बंद ठेवण्यात येणार असली तर या दुकानातील मालांची होम डिलीव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सकाळी ७ ते संध्याकाळी ८ यावेळेत दुकानदारांना आपल्या ग्राहकांना मालांची होम डिलीव्हरी करता येणे शक्य राहणार आहे. सदरच्या वेळेत घट किंवा वाढ करण्याचे अधिकार राज्य सरकारने स्थानिक प्रशासनास दिले आहेत.
याशिवाय यामध्ये अन्य दुकाने, सेवा यांचा समावेश स्थानिक प्रशासनास करावयाचा असेल तर त्यासंबधी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या या नव्या नियमामुळे रस्त्यावर होत असलेली गर्दी आणि नागरीकांच्या बाहेर पडण्यावर आणखी एकप्रकारे निर्बंध आले आहेत. मात्र खरेदीच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरीकांची कोरोना विषाणूची साखळी तोडण्यास मदत होणार आहे.