पालघर : प्रतिनिधी
चिंतामण वनगा यांच्या दुःखद निधनामुळे या जागी निवडणूक होत आहे. हे दुर्दैवी असून चिंतामण रावांच्या जागी भाजपने श्रीनिवासला उमेदवारी दिली असती तर मी त्याच्या भाजपचा उमेदवार म्हणून प्रचारासाठी स्वतः आलो असतो. परंतु, ज्या चिंतामण रावांनी आपली हयात भगव्यासाठी हिंदुत्वासाठी वेचली त्यांच्या दुःखद निधनानंतर जर भाजप गरज सरो वैद्य मारो सारखे वागणार असेल तर या औलादीला ठेचलंच पाहिजे असे सांगत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.
या निवडणुकीच्या निमित्ताने कोणी कोणी येते असा उपरोधिक उल्लेख उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांचा करत कालच एक बुवा आला होता मोठ्या मोठ्या थापा मारल्या आणि तुम्ही आपले रिकाम्या कळशा घेऊन परत आपापल्या घरी गेलात. विक्रमगड येथील मोखाड्यातील महिला माझ्याकडे मगाशी आल्या आणि म्हणाल्या आम्हाला कळशीत पाणी कधी देणार मी त्यांना तेव्हाच सांगितले मुंबई महानगर पालिकेने इथे जे मोठे धारण बांधले आहे ते धरण पूर्ण झाल्यावर निश्चित पणे आम्ही तुम्हाला घरपोच पाणी देणार. मुंबई महानगरपालिकेने जिल्हा परिषदेला ४ कोटी निधी हस्तांतरित सुद्धा केला आहे, आता पाईप जोडणी वगैरेची कामे होत असतील, मी तुम्हाला पाणी देणार म्हणजे देणार, पळून जाणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
मोखाडा नगरपरिषदेत काम सुद्धा मार्गी लागलेले आहे. आज निवडणुकी पुरते मी सांगितले काय हवे ते देतो आणि नंतर आलोच नाही तर तसे आम्ही करत नाही. कारण पुन्हा निवडणूक लागणारच आहे. पुन्हा मला मते मागायला यायचेच आहे. त्यामुळे मी हि कामे पूर्ण करणार आणि मला केवळ आताच्या पिढीची मते नको आहेत. तर येणाऱ्या पुढच्या पिढीचीही मते हवी आहेत. त्यामुळे आता हि निवडणूक दुर्दैवाने आली म्हणून आपण इथे आहोत पण पुन्हा आठ दहा महिन्यांनी निवडणूक येणारच असल्याचे त्यांनी सांगितले.
मी म्हणून तुमच्या मध्ये येऊन बोलतो भाजप आणि इतर पक्षातून आलेल्या जयराम मामा सारख्या कार्यकर्त्यांचे मी शिवसेनेत स्वागत करतो , कारण तुम्ही ज्या भगव्या खाली चिंतामण वनगा यांच्या सोबत काम करत होतात तो पक्ष आता भगव्याचा राहिलेला नाही.आता त्या पक्षात विचार काही राहिलेले नाही…त्या पक्षात थैली दाखवली का प्रवेश मिळतो, माझ्याकडे जी जिवाभावाची माणसे आहेत ती माजी थैली. पैशाची आमिष शिवसेनेत चालत नसल्याचे ते म्हणाले.
आज मुख्यमंत्री म्हणत आहेत कि आम्ही गावित याना विधानसभेला उमेदवारी देणार होतो म्हणजे तुमच्या मनात आधीच काळेबेरे होते. मुख्यमंत्र्यांना वाटले हा गरीब बिचारा आदिवासी वनगा परिवार काय करणार? येतील भाजपच्या मागे मागे…यांच्याकडे ना पैसे ना अडका याना कोण विचारणार ? पण त्यांना हे कळले नाही कि पैशाची श्रीमंती मोजणारे आम्ही नाही आहोत. आम्ही हृदयाची श्रीमंती मोजतो. माझ्याकडे वनगा परिवार आला तेव्हा ते म्हणाले कि आम्हाला भाजपने वाईट वागणूक दिली. दुसऱ्या कुठल्या पक्षात आम्ही जाऊ इच्छीत नाही. कारण आमच्या परिवाराचा भगवा विचार आहे आणि तो फक्त शिवसेनेकडे आहे. दुसऱ्या विचारांच्या पक्षात आम्ही कसे जाणार भाजपने मात्र काँग्रेसचा उमेदवार घेतला. दुसऱ्या विचारांचा उमेदवार घेतला म्हणजे यांना आता जो आपल्याला विरोध करत आला त्याला आता तो दुसरा तुमच्या डोक्यावर बसवला असल्याची टीकाही त्यांनी केली.