मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेत आज विभागीय अनुदानाच्या मागणीवर चर्चा करताना भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहीत यांनी मुंबईला अधिक निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनीही आपल्या भाषणात मुंबईच्या विविध प्रश्नांना स्पर्श केला. यावेळी सुनिल प्रभू यांनी राज पुरोहीत यांच्याकडे पहात कल हो ना हो हमारी युती बनी रहेगी . राज पुरोहीत यांनी मांडलेल्या मुंबईच्या प्रश्नांबाबत शिवसेना कायम असेल, मुंबईच्या प्रश्नांवर आपली युती कायम राहील असे सांगत एका पक्षाच्या प्रतोदांनी दुसऱ्या पक्षाच्या प्रतोदांना युती अबाधित राहण्याचे आश्वासन दिले.
राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप-शिवसेनेची युती कायम राहील आणि पुढील निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धोबीपछाड देत हेच सरकार पुन्हा सत्तेत येईल असे ठासून सांगितले. त्यावर शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पलटवार करताना या युतीची शक्यता फेटाळून लावली होती.
विशेष म्हणजे राज्यातील सत्तेत भागीदारी असूनही शिवसेनेकडून भाजपच्या कार्यपध्दतीवर सातत्याने कोरडे ओढले जात आहेत. त्यातच शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सभेत आगामी निवडणूका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली. त्यानुसार स्वतंत्र निवडणूकांची तयारीही सुरु केलेली आहे. यापार्श्वभूमीवर युती पुढील निवडणूकीतही रहावी यासाठी भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचे काम सुरु असतानाच ऐन विधानसभेत शिवसेनेच्या मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी असे जाहीर आश्वासन दिल्याने उध्दव ठाकरे यांच्या परस्परच शिवसेना, भाजपमध्ये युती झाल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु झाली.