मुंबई : प्रतिनिधी
जवळपास एक महिन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियना हीचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या पध्दतीने तपास करत आहेत. या दोन्ही मृत्यूप्रकरणी पोलिस तपासातील जेवढे अॅगल असतील त्या सर्व पध्दतीने तपास करण्यात येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले. त्यानुसार सुशांतसिंग राजपूत याच्याशी संबधित असलेल्या जवळपास प्रत्येकाचे जबाब पोलिसांकडून घेण्यात येत आहेत. परंतु मागील काही दिवसात याप्रकरणाचा पोलिसी तपासापेक्षा राजकिय पध्दतीनेच तपास जाहीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणी भाजपा आमदार आणि दिक्षा सालियनाच्या वडीलांनी लिहिलेल्या पत्रातील गर्भीितार्थ अनेक गोष्टी सांगू जातात.
याप्रकरणात सुरुवातीला सुशांतसिंग राजपूत याच्या कुटुंबियांनी कोणतीच तक्रार केली नसल्याचे काही दिवसांपर्यत दृष्य होते. मात्र त्यांनी मुंबई सोडून पटना येथे गेल्यानंतर काही दिवसांनी राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर बिहार आणि महाराष्ट्राच्या राजकारण ढवळाढवळ होण्यास सुरुवात झाली. शिवसेना काँग्रेस आणि त्यानंतर भाजपावासी झालेले खासदार नारायण राणे यांनी राजपूत प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा संबध असल्याचा आरोप करून खळबळ उडून दिल्याने याप्रकरणाची मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजपाने केली. आणि तीच री बिहार सरकारने ओढत केंद्र सरकारकडे केली. त्यानुसार रिया चक्रवती प्रकरणात केंद्राचे वकिल तुषार मेहता यांनी बिहार सरकारची विनंती केंद्राने मान्य केल्याचे सांगितले.
याच कालावधीत भाजपाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी चढायला लागल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी याप्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करा अन्यथा अन्य कोणाकडून करा असे वक्तव्य केले. त्याच्या या वक्तव्यामागे कदाचित राजपूत-सालियना यांच्या आत्महत्येमागील कोणतेच कारण अथवा त्यामागील काळेबेरे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्यानेच आयुक्तांनी तशा पध्दतीचे वक्तव्य केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी काल ७ ऑगस्ट २०२० रोजी मुंबई पोलिस आयुक्त परमबिरसिंग यांना एका महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी राज्य सरकारकडे एका पत्राद्वारे केली. इथपर्यत ही मागणी ठिक होती. मात्र याबाबत कार्यवाही न झाल्यास आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दाद मागेन याची संबधितांनी नोंद घ्यावी असा गर्भित इशारा राज्य सरकार आणि पोलिसांना दिला.
एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदाराने सत्तेत असलेल्या राज्य सरकारला आणि या सरकारच्या प्रशासनाचा भाग असणाऱ्या पोलिस दलाला अशा पध्दतीचा गर्भित इशारा काय किंवा धमकी देणे कोणत्या लोकशाही पध्दतीत बसते याविषयी कळायला मार्ग नाही.
दुसऱ्याबाजूला या प्रमाणात काहीशी दुर्लक्षित राहीलेला मुद्दा म्हणजे आत्महत्या केलेल्या दिशा सालियना या मॅनेजरची. तिच्या मृत्यूनंतर त्याचा थेट संबध सुशांतसिंग राजपूतशी जोडण्याची स्पर्धा लावण्याची चढाओढ काही प्रसारमाध्यमांनी सुरु केली होती. ती स्पर्धा आजही आहे.
याप्रकरणी दिशा सालियना हीचे वडील सतीश सालियना यांनी एक विस्तृत पत्र लिहित पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये, मुलगी दिशा हिच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासाबद्दल समाधानी असल्याचे सांगत पोलिसांच्या तपासावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर याप्रश्नी पत्रकार आणि प्रसारमाध्यमाकडून जे वृत प्रकाशित करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही व्यथित झालो असून त्या वृतांमुळे बदनामी होत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
तसेच कोणत्याही प्रसारमाध्यमातील व्यक्ती आमच्या घराच्या जवळ येतो, स्वत:च्या बॅनरचे लपवून आम्हाला नको ते प्रश्न विचारत असतो. याशिवाय मुळ घटनेबाबत गैरसमज निर्माण होवू शकतील असे बातमीपत्र त्यांच्याकडून दाखविले जाते. त्यांच्या या कृत्यातून आमची हॅरेसमेंट होत असल्याचा आरोप त्यांनी प्रसार माध्यमांवर करण्यात आला. तसेच याप्रकरणाची गंभीर दखल घेवून पोलिसांनी संबधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
या दोन्ही पत्रातील मागण्या आणि त्यामागील भावना पाहिली तर ज्याची मुलगी आहे त्या व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजपा या राजकिय पक्षाच्या आमदाराने दिलेली गर्भित धमकी यातील अंतर खुप काही सांगून जाते.
त्याचबरोबर सुशांतसिंग राजपूत प्रकरणात शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचे नाव पुढे आणले जात आहे किंवा येत आहे, त्याबाबतची खातरजमा आज ना उद्या मुंबई पोलिसांकडून होणारच आहे. नसेल तर किमान त्यातील सत्य लोकांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही.