मुंबई : प्रतिनिधी
भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आयपीएस अधिकार्यांसोबत बैठकी झाल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जातेय, हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे ‘आधी चोर्या-आता बहाणे’ असा उपरोधिक टोला लगावत मलिक यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतित्तुर दिले.
सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांनी आयपीएस अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतरच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपास प्रतित्तुर देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी वरील वक्तव्य केले.
स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, कोरोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. रोज सकाळी मिडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे असा टोला लगावत तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? का तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार आहेत? असा सवाल करत त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘आधी चोर्या-नंतर बहाणे’ अशाच वर्गवारीत मोडणारा असल्याची टीका त्यांनी केली.
असेच प्रकार बेळगावमधील भाजपाच्या विजयानंतर काही नेते करीत आहेत. मराठी माणसाचा पराभव वगैरे बिरूद ते लावतील. पण, भाजपाच्या विजयी ३६ नगरसेवकांपैकी २३ मराठी आहेत, हे तुम्हाला कधीही सांगणार नाहीत. निव्वळ भावनात्मक विषय करून सामान्य जनतेची फसवणूक तुम्ही करू शकत नाही. निवडणूक निकालावर शंका उपस्थित करून शिवसेना आता काँग्रेसच्या अधिक जवळ गेली आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारी पूर्वी एकमेव गलितगात्र काँग्रेस होती. शिवसेनेलाही त्याच रांगेत जाऊन बसण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.