कर्जत जामखेडः प्रतिनिधी
कर्जत- जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहिला नाही ही हेडलाईन २४ तारीखला वर्तमानपत्रांची असेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कर्जतच्या जाहीर सभेत व्यक्त केला.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान महाराष्ट्रात सध्या कर्जत-जामखेडचीच चर्चा सुरु आहे. या तरुणाने भाजपाची झोप उडवली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री तीन – तीन सभा कर्जत- जामखेडमध्ये घेत आहेत असा टोलाही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
नव्या पिढीला काम नाही आणि काम आहे ते कारखाने, कंपन्या बंद होत आहेत अशा पध्दतीची भाजपाची राजवट सुरु असल्याचा टोला त्यांनी लगावला.
५२ वर्षापुर्वी मी आज रोहित ज्या वयात आहे. त्या वयात मी विधानसभेला उभा होता. बारामतीमध्ये त्यावेळी काही नव्हते. त्या गावाचा चेहरा बदलला. परिवर्तन झालं. रोहितने कर्जत- जामखेडची गेली पाच वर्षे जबाबदारी घेतली आहे. या गावाची ओळख दुष्काळी भाग आहे. त्यावेळी दुष्काळ बघायला पंडीत नेहरु, इंदिरा गांधी आल्या होत्या. या तरुणाने याविभागाचा चेहरामोहरा कसा बदलला हे बघायला यापुढील दिवसात पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नाही असा शब्दही त्यांनी जनतेला दिला.
