मुंबई : प्रतिनिधी
या देशातील शेतकरी वर्ग नरेंद्र मोदी सरकारच्याविरोधात गेला आहे आणि त्याचंच प्रत्यंतर दिसायला लागल्यामुळे चिडून दिल्लीमध्ये पोलिसांनी अतिरेकी कारवाई केली आणि शेतकऱ्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न झाला परंतु देशातील शेतकरी नरेंद्र मोदींच्या दडपशाहीला घाबरणार नाही आणि समर्थपणे एकत्र येवून हे सरकार दूर करण्याचे पहिले पाऊल टाकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर सरकारकडून करण्यात आलेल्या लाठीहल्ला प्रकरणावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिडियाशी बोलताना केंद्र व राज्यसरकारवर टिकेचे जोरदार आसूढ ओढले.
देशात कोणत्या भागात कोणत्याही पिकाला सरकारने हमीभाव दिला नाही…दिल्या त्या फक्त घोषणा दिल्या…चुकीची आश्वासने…चुकीची मृगजळासारखी दिसणारी आश्वासने देवून मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे. आज तेच शेतकरी त्वेषाने महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने दिल्लीत येवून सरकारला जाब विचारत आहेत. त्या शेतकऱ्यांचे म्हणणं ऐकण्याऐवजी अश्रुधुर, लाठयाकाठया आणि पाण्याचा मारा करुन त्यांना तिथून घालवून देण्याचे पाप नरेंद्र मोदी सरकारने केले असा आरोपही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
या देशाचं दुर्देव आहे ज्यांच्यावर देशातील शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला. दीडपट तुमचं उत्पादन होईल आणि तेवढयाप्रमाणात आधारभूत किंमती देवू असं खोटं आश्वासन ज्यांनी दिलं. त्या सर्व आश्वासनांना हरताळ फासल्यामुळे भारतात अनेक राज्यामध्ये मोठयाप्रमाणात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकरी आत्महत्या व्हायला लागल्या आहेत. आत्महत्या यांचं सरकार आल्यावर वाढल्या. महाराष्ट्रात दरवर्षी ३ हजार या वेगाने आत्महत्या झाल्या आहेत असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.