मुंबई: प्रतिनिधी
भोसरी येथील जमिन खरेदीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला काल ईडीने अटक केल्यानंतर आज खडसे यांनाच ईडीने चौकशीला पाचारण करण्यात आले. तसेच सकाळपासून त्यांची ईडी कार्यालयात अद्यापही चौकशी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, केवळ राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंना सन्मानाने प्रवेश दिल्यानेच भाजपा चिडून जाऊन केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला.
भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात असल्याचा आरोप केला.
एकनाथ खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात तथ्य अद्याप आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजुला करण्यात आले असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यापूर्वीही ईडीने एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यावेळी त्यांची दिवसभर चौकशी करून परत पाठविण्यात आले होते. त्यानंतर काल त्यांच्या जावयांना भोसरी जमिन प्रकरणी अटक करण्यात आली आणि आज खडसे यांनाच चौकशीसाठी पाचारण केले.
चौकशीला जाण्यापूर्वी खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज सकाळपासूनच जळगांवात आज कुछ तो होनेवाला है असे मेसेज फिरत होते.