मुंबईः प्रतिनिधी
राज्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. केंद्र सरकारमध्ये राज्यातील आठ मंत्री आहेत. परंतु त्यांनी या संकटावेळी महाराष्ट्रासाठी भरीव आर्थिक मदत आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असतानाही त्यांच्याकडून प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. महापुरातून जनता अजून सावरलेली नसताना मुख्यमंत्र्यांना मात्र पुन्हा एकदा आपल्या प्रचार यात्रेची ओढ लागलेली दिसते. राज्य संकटात असताना प्रचाराचे वेध लागणे हा असंवेदनशिलपणाचा कळस असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
महाराष्ट्रावर एवढी मोठी आपत्ती ओढवलेली असताना केंद्र सरकारने त्याची अजून गंभीर दखल घेतलेली नाही. शेजारच्या कर्नाटकमध्ये दोन-दोन केंद्रीय मंत्री येऊन पाहणी करुन गेले पण महाराष्ट्रातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांनी वेळ दिला नसल्याचा आरोही त्यांनी केला.
राज्यातील पूरग्रस्त भागात झालेले नुकसान पाहता १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारकडे ६ हजार कोटी रुपयांची मागणी केलेली असली तरी केंद्र सरकारची मदत मिळण्यास वेळ लागणार असल्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने मदतीचा ओघ वाढवावा अशी मागणी त्यांनी केली.
पुरग्रस्त भागात शेतीची अपरिमित हानी झालेली आहे. ऊस, केळी, भाजीपाला, सोयाबीन, मका या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. पशुधनाची या पुरात वाताहात झालेली आहे. सरकारने पशुधनासाठी जाहीर केलेली ३० हजार रुपयांची मदत अपुरी असून पशुधनच द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.
या भागातील शेतकऱ्यांची सर्व थकित कर्ज माफ करुन नवे कर्ज उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. पुरात झालेल्या घरांची पुनर्बांधणी करावी, छोट्या दुकानदारांनाही तातडीने आर्थिक मदत करावी तसेच पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचा जीएसटी माफ करावा, विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्कही माफ करावे अशी मागणीही त्यांनी केली.
Tags bjp cm fadnavis congress flood affected area mahajanadesh yatra vijay wadettiwar
Check Also
नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली
जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …