मुंबई: विशेष प्रतिनिधी
अर्थसंकल्पिय अधिवेशन बैठकीचे नियोजन करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांची आज बैठक झाली. मात्र अधिवेशनाच्या कालावधीवरून बैठकीत एकमत न झाल्याने विरोधकांनी विधिमंडळ कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.
तर सासंदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेत्यांचा हा आरोप खोडून काढत विरोधी पक्षांनी कामकाज मंडळाची बैठक संपल्यावर बहिष्कार टाकल्याचे सांगत त्यांच्या बहिष्काराला फारसा अर्थ नसल्याची टीकाही केली.
विरोधकांकडून अर्थात भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्यांचा करण्याची मागणी बैठकीत केली. मात्र नेहमीप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी त्यास विरोध दर्शवित अधिवेशन चार आठवड्याचे घेता येत नसल्याचे सांगत अधिवेशन फक्त १० दिवसाचे घेणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यात अनेक प्रश्न असून त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र राज्य सरकार पूजा चव्हाणच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या वनमंत्री संजय राठोड यांच्यासह अन्य काही मंत्र्यांना वाचविण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यास तयार नसल्याचा आरोप केला.
याबाबत मंत्री अनिल परब यांना विचारले असता त्यांनी सरकार अशा कोणत्याही गोष्टीपासून सरकार पळ काढत नसल्याचे सांगत विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेतली.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु झाल्याने १ मार्चपासून सुरु होणारे अर्थसंकल्पिय अधिवेशन कालावधी कमी असला तरी चांगलेच वादळी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच बीडच्या पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात वनमंत्री तथा शिवसेनेचे मंत्री संजय राठोड हे आधीच आले आहेत. त्यांच्या राजीनाम्यावरूनही विरोधक भाजपाने आधीच आक्रमक पवित्रा घेतला आहे.
त्यापाठोपाठ मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनाही भाजपाकडून सातत्याने घेरण्याच्या तयारी आहेत. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधला सामना चांगलाच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले.