मुंबई : प्रतिनिधी
साधारणत: पाच वर्षापुर्वीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडीत महिलेने आरोपींविरोधात निकराचा लढा देतं त्यांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला याचा राग धरून ग्रामपंचायतीने या महिलेलाच गावाबाहेर काढण्याचा ठराव केल्याचा संतापजनक प्रकार बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील पाचेगावात घडल्याची माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिली असून सदर ग्रामपंचायती विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
ज्याचा पाठपुरावा सामाजिक कार्यकर्त्या माझी मैत्रिण सत्यभामा सौंदरमल यांनी प्रत्यक्ष जाऊन केला. मिळालेल्या माहितीनुसार बलात्कारानंतर तिला गाडीत घालुन पोलीस ठाण्यासमोरच फेकले होते. आरोपींना जामीन झाल्यानंतर त्यांनी तिला पुन्हा मारहाण केली होती पीडितेने सदरबाबत न्यायालयात दाद मागितल्यानंतर आरोपींचा जामीन रद्द झाला होता. न्यायालयात तीन वर्षं प्रकरण चाललं आणि आरोपीना नुकतीच जन्मठेपेची शिक्षा झाली. पण आरोपी गावातीलच आणि पुढाऱ्यांचे नातेवाईक असल्याचं कळतंय. त्यामुळे आता पीडित महिलेलाच गावातून हाकलण्यासाठी सगळे एकवटलेत तिला गावातून हद्दपार करण्यातं यावे असा ठराव या गावाने केल्याचा आरोप त्यांनी केला.
ग्रामसभेचा हा ठराव बेकायदेशीर असून या प्रकरणी मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याने संबंधित ग्रामपंचायत बरखास्त करण्यात येऊन संबंधित सदस्यांना व सरपंचाला निवडणूक लढवण्याची बंदी घालण्यात यावी तसेच संबंधित ग्रामसेवकांना शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे ही आमची सरकारकडे मागणी त्यांनी केली.