मुंबई: प्रतिनिधी
आयटी सेवा पुरवणाऱ्या देशातील चार मोठ्या कंपन्या या आर्थिक वर्षात १.२० लाख फ्रेशर्सची भरती करणार आहेत. इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल कॉलेज कॅम्पस आणिइतर मार्गांनी भरती करतील. या भरतीत पहिल्या तिमाहीतील भरतीचा समावेश केला तर हा आकडा १.६० लाख होईल. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएलने १.२० लाख नवीन लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. खरं तर, या कंपन्यांमधील कर्मचारी सोडून जाण्याचा दर खूप जास्त आहे. त्यामुळे नवीन क्षेत्रातून येणारी मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांना कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून दरम्यान या चार कंपन्यांनी ४० हजार फ्रेशर्सची भरती केली आहे. या चार कंपन्यांमध्ये आयटी क्षेत्रातील एकूण ४६ लाख कर्मचाऱ्यांपैकी एक चतुर्थांश कर्मचारी काम करतात. या चौघांनी या वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यात १.०२ लाख कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. यामध्ये काही फ्रेशर्स आहेत तर काही अनुभवी लोक आहेत.
कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. इन्फोसिसने वर्षातून दोनदा पगार वाढवला, तरीही त्याचे कर्मचारी कंपनी सोडून गेले. दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिसमधून बाहेर पडण्याचा दर २०.१ टक्के होता. जूनमध्ये हा दर १३.९ टक्के होता.
विप्रोने दुसऱ्या तिमाहीत ११,४७५ कर्मचाऱ्यांची भरती केली. यामध्ये ८ हजार फ्रेशर्स होते. चालू आर्थिक वर्षात कंपनीने १६ ते १७ हजार लोकांची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर पुढील वर्षात २५ ते ३० हजार फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. कॅम्पसमधून भरती झालेल्यांना विप्रोने पंचवार्षिक वेतन वाढ योजनाही दिली आहे. विप्रोमधील कर्मचारी गळतीचा दर २० टक्के आहे.
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने या आर्थिक वर्षात ७८ हजार लोकांची भरती करणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी त्यांनी ४३ हजारांची भरती करण्याचे लक्ष्य ठेवलेहोते. टीसीएसमध्ये कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर ११.९ टक्के आहे. पहिल्या तिमाहीत ८.६ टक्के कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली.
त्याचप्रमाणे इन्फोसिसने या आर्थिक वर्षात ४५,००० फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापूर्वी ३५,००० फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याबाबत कंपनीने सांगितले होते. एचसीएल टेक्नॉलॉजीने चालू आर्थिक वर्षात 22 हजार लोकांना नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे. एचसीएलमधून १५.७ टक्के कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या तिमाहीत नोकरी सोडली. तर ११.८ टक्के कर्मचारी पहिल्या तिमाहीत कंपनीतून बाहेर पडले.