मुंबईः प्रतिनिधी
भिमा कोरेगाव प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश आहे. याप्रकरणाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत असतानाही हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळण्यात अपयश आल्याने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून राज्यात जातीय तणाव निर्माण झालाय. सरकार त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. जातीय तणाव निर्माण करणा–यांवर सरकार कारवाई का करित नाही? त्यांना अटक का केली जात नाही? सरकारच्या मुक संमतीने जाणिवपूर्वक हे सुरु असल्याचा आरोप करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा.
काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरे घेणार असून काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधीच्या काही सभा महाराष्ट्रात झाल्या पाहीजेत अशी नेत्यांची इच्छा आहे. यासंदर्भात प्रदेश काँग्रेस राहुल गांधींना महाराष्ट्रात सभा घेण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी दिली.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी मोघम आरोप करण्यापेक्षा ज्या नेत्याने त्यांना फोन करून त्यांच्यावर दबाव आणला त्या नेत्याचे नाव मेहता यांनी जाहीर करावे.