मुंबई : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर मुंबईसह राज्यभरात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भीम आर्मीच्या शिष्टमंडळाला दिली.
१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या देशभरातील आंबेडकरी अनुयायांवर हल्ले करण्यात आले होते. या दंगलीचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. या दंगलीच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी बंदचे आंदोलन पुकारला. यात सहभागी झालेल्या सर्व आंदोलकांसह हजारो लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबले. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने या सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुंबईतील अधिवेशनात केली होती. मात्र ही घोषणा होऊन देखील त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्यामुळे हजारो आंदोलक विद्यार्थी,नोकरदार व निरपराध नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.
भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य व माजी महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेच्या शिष्टमंडळाने आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली व आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
भीमा कोरेगाव आंदोलकांचा विषय हा गंभीर विषय असून सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. लवकरच या सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार असून हे गुन्हे मागे घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती अशोकभाऊ कांबळे यांनी दिली.
या शिष्टमंडळात दक्षिण मध्य मुंबई माजी जिल्हा प्रमुख अविनाश समींदर, मुंबई उपाध्यक्ष अविनाश गरूड, ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे आदी भीम आर्मी पदाधिका-यांचा समावेश होता.