मुंबई : प्रतिनिधी
कोरोना काळातील वाढीव व चुकीच्या वीज बिलांमध्ये सवलत देणार नाही असं सांगून खोटं बोलणार्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी इशारा दिला.
भाजपाने अन्यायी वीज बिलांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर वीज बिलात सवलत देऊ असे सरकारने जाहीर केले, तसा प्रस्ताव तयार झाल्याचेही सांगितले, अर्थ खात्याबरोबर बैठक झाली असेही सांगितले व राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढच्या आठवड्यात प्रस्ताव आणला जाणार असे जाहीर करून आज घुमजाव केल्याबद्दल विधानसभेच्या आगामी अधिवेशनात ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
“वीज बिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही” हे ऊर्जा मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे केवळ बेशरमपणा नसून खोटारडेपणाचा कळस अशी घणाघाती टीका करत ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीज बिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही व वीज बिल भरले नसल्यास तात्काळ वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले.
राज्यातील एका एसटी कर्मचार्याने आत्महत्या केल्यानंतर या सरकारला जाग आली, असे अजून किती जीव हे सरकार घेणार आहे? त्यामुळे आता या बेशरम सरकारला १००० वॉल्टचे शॉक देण्याची आवश्यकता आहे अशी टीका त्यांनी केली.
भारतीय जनता पार्टीने आंदोलन केल्यानंतर वीज बिलामध्ये सवलत देण्याच्या निर्णयाच नाटक या सरकारने केले, पण अखेर या सरकारचा खोटा चेहरा जनतेसमोर आला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल आणि या सरकारला वीज बिलामध्ये सवलत द्यायला भाग पाडेल असा इशाराही त्यांनी दिला.