भंडारा : प्रतिनिधी
निव्वळ निष्काळजीपणामुळे या १० बालकांना जग पाहण्यापूर्वीच प्राण सोडावे लागले, यापेक्षा वेदनादायी आणखी काय असावे? अतिशय अक्षम्य अशीच ही घटना आहे. फायर सेफ्टीबाबतचा प्रस्ताव आरोग्य महासंचालक आणि पुढे मंत्रालयात पोहोचला. मात्र त्यावर निर्णय झाला नाही. त्यावर निर्णय झाला असता तर ही वेळ आलीच नसती अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला संध्याकाळी भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
फायर सेफ्टीची कुठलीही व्यवस्था नाही. यासाठीचा प्रस्ताव मे महिन्यात आरोग्य सेवा सहसंचालक आणि पुढे मंत्रालयापर्यंत पोहोचलेला. पण, त्यावर कुठलाही निर्णय नसल्याचा आरोप करत त्यावर वेळीच निर्णय झाले असते, तर आज या बालकांना प्राण गमवावे लागले नसते असे ते म्हणाले.
सुरक्षारक्षकांनी प्रयत्नांची शर्थ करून ७ बालकांना वाचविले, याबद्दल त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. मात्र,१० बालकांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. सर्वच स्तरावरील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. राज्यातील सर्वच रूग्णालयांचे सेफ्टी ऑडिट झाले पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.