मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांना व वस्त्यांना महसुली गावांचा दर्जा देण्यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली. या संदर्भात सदस्य राजेश राठोड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात बोलत होते.
औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील ५ वाडी/तांड्याना महसुली गावांचा दर्जा देण्याचे प्रस्ताव परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील आगरगाव व येरणगाव या महसुली गावाच्या बाहेर असलेल्या तांड्याना तसेच वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील बेल्हारा व दहेगाव या ३०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली गावांचा दर्जा देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. कोकणातील डोंगराळ भागात ज्या धनगरवाड्या आहेत त्यांना सुविधा देण्यासाठी लोकसंख्येचे निकष बदलण्याबाबत विचार केला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री सुरेश धस, रामदास कदम, गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.