Breaking News

बंदिस्त… कलावंत आणि सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची लघुकथा

खिडकी समोर एक  कावळा आजकाल नेहमी  ओरडतो. मी ही त्याचं  ओरडणं हल्ली  हल्ली ऐकायला लागलो. त्याला  एक  दोन  वेळा पाहिलं होतं, पण तो हल्ली  थोडा उजळ  दिसू  लागलाय. माणसं घरात बंद झाल्यापासून तो  आता डेरिंग  करून  खिडकी पाशी सहज  येऊन  बसतो.

तो आता पाणी  आणि  खायला  धमकी  दिल्यासारखा मागू लागतो. तो दिवसभराच्या शौर्य कथा मला  सांगतो, नाहीं  मी झक  मरून  ऐकतो. आज  त्याने  चक्क एका ढगाला ट्रेनच्या  पटरीवरून ओढत  नेलं, त्यांनी वेस्टन एक्सप्रेस हायवेवर मोठ मोठाली  तलावं उभी  केली. गाडयांवर जेवण, उंच बिल्डिंगवर  झुला, गल्लीगलीतून किंकाळ्या, खिडक्यांच्या  काचा  रित्या केल्या. एकंदरीत  मी  आज  खूप  थकलोय, असं  म्हणून  त्याने  मला  पाण्याची ऑर्डर केली. पाणी  पिता पिता  तो  म्हणाला आज  माझ्या शापाने एक  गाय  मेली आणि  हसू  लागला. मी  म्हटलं  अरे मूर्ख  आहेस का?  आज  कोणी तरी माणूस कोणा तरी  माणसाचा जीव  घेणार. कावळ्याने एक  पंख फडफडवला आणि  म्हणाला. “आज  सब धरम अपने अपने  बिस्तर पर सो  गये  हैं “. अरे  एवढी  गंभीर  परिस्थिती  असताना  हा  चुतिया  डायलॉग काय  मारतोय. इतक्यात  तो  स्वतःच  म्हणाला  तुझ्याच  व्हॉट्सअपला  वाचला  सकाळी.

कावळा  आता  झुंडीच्या  झुंडी  घेऊन  यायला  लागला.  त्याच्या  प्रमाणेच  बाकीचे ही  तितकीच अरेराविची भाषा  करतात. धड  लिहू  देतं  नाहीं , कांहीं  करू  देत नाहीत. बाहेर  पडलो  तर  घरावर  कब्जा घेऊ  शकतात. आज  दोघेजण  खिडकीतून आत टेबलवर बसून आहेत. त्यातला  एक  मला  सहज  म्हणाला. माणसांनी  आता  लवकर  मरून  जावं, आमच्या  हातात  सत्ता  द्यावी  हजारो  लाखो वर्ष माणसांनी माणसाच्या स्वार्थासाठी जमिन, जल, जंगलं  नष्ट केली. खरंच  माणसांनी  एकतर  सरेंडर  व्हाव, नाहीतर आमच्या  असंख्य  झुंडी माणसावर  हल्ले  करतील. कावळे  आता खाली फुकट ओरडत  नाहीत. ते  आता  ओरडतील ते  तेंव्हाच, जेंव्हा माणसांवर ते  राज्य  करतील. ते  निघणार इतक्यात मी  घाबरत घाबरत विचारलं रात्री  जेवणाचं  कसं? एक  कावळा  म्हणाला “रस्त्यावर पडलेल्या  मुर्द्यांची विल्हेवाट कोण  लावणार?” आणि सर्व खिडकीवर  त्यांची  बसलेली  झुंड खीखी हसत  दिशेनाशी झाली. खिडकीचे  गज घट्ट  पकडले आणि  एकच  वाक्य डोक्यात घुमू लागलं  ‘साला आपल्याला पण  असं  उडता  आलं असतं तर अख्खी  मुंबई घोळून प्यायलो  असतो.

लेखक-सुदेश जाधव 

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *