नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील औरंगाबाद शहराचे नामांतर करून संभाजीनगर नाव ठेवण्यावरून शिवसेना नेते आणि काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणवर कलगीतुरा सुरु झाला असतानाच याप्रश्नी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी शरद पवार, सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री बसून तोडगा काढतील असा विश्वास व्यक्त केला.
औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत विरोधाभास असल्याचे समोर आले आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा पहिल्यापासूनचा प्रमुख अजेंडा राहिला आहे. मात्र, शहरांची नाव बदलून विकास होत नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याने त्यांचा याला विरोध आहे.
नाशिक येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
औरंगाबादच्या नामांतरावरुन निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील. मात्र, यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तिनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही समोपचाराने मार्ग काढू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.