मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी
ख्रिश्चिअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील महत्वाचा माणूस आहे. त्याने दिलेल्या जबानीत १० टक्के अर्थात १२५ कोटी रूपयांची लाच गांधी कुटुंबातील व्यक्तींना दिल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद असल्याचे सांगत या घोटाळ्याचा थेट लाभ काँग्रेस पार्टीला झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत ईडीने हीच गोष्ट कोर्टासमोर सांगितली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने आणि गांधी कुटुंबानं याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केले.
मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते माधव भंडारी, केशव उपाध्ये, गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
इटालिअन कोर्टाने ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी जे निर्णय दिले आहेत. त्यामध्ये चार वेळा सोनिया गांधींचं नाव आलं आहे. त्यामुळे हे जे पुरावे समोर आले आहेत. त्यावर काँग्रेसने उत्तर दिले पाहिजे. ख्रिश्चन मिशेलला ताब्यात घेतल्यानंतर ईडी त्याच्याकडे चौकशी करीत असून चौकशी दरम्यान तो माहितीही देत असल्याचे त्यांनी सांगितले.
या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी मिशेलने आपल्या एजन्सीसमोर जे खुलासे केले आहेत. तसेच जे कोर्टाला सांगितले आहे, यात सोनिया गांधींच नाव आहे. यामध्ये इटालिअन लेडी त्यांचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो, असा उल्लेख आला आहे. यावरुन यात गांधी कुटुंबाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
या हेलिकॉप्टर घोटळ्यात कालपर्यंत राहुल गांधी एचएएलच नाव घेत होते. यात एचएएलच नाव होतं, मात्र, त्याला दुय्यम स्थान देण्यात आलं होतं. दुसरी एक बाब यात समोर आली ती म्हणजे, मिशेलने त्याच्या वकिलांना एक चिठ्ठी दिली, त्यात त्याने सोनिया गांधींच्या संदर्भात काय प्रश्न येऊ शकतात आणि त्याची उत्तरे कशी द्यायची हे त्यानं विचारलं. जर सोनिया गांधी यात सहभागी नसतील तर त्याने हे का केलं, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.