मुंबई: प्रतिनिधी
धुळ्यातील सुनील पाटील याचा राष्ट्रवादीशी संबध काय? तो गायब झाला की राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी ठेवलेय? तो परराज्यातून “गेम” वाजवतो म्हणतोय त्यामुळे त्याच्यावर राज्य शासनाने तातडीने गुन्हा दाखल करुन या केसचा संबंध आंतरराज्य असल्याने तपास सीबीआयकडे द्यावा, अन्यथा यामध्ये राज्य सरकारचे हात गुंतलेले आहेत हे स्पष्ट होईल. अशी आग्रही मागणी करीत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी “गेले काही दिवस राष्ट्रवादीच्या सुरु असलेल्या पत्रकार परिषदा म्हणजे, ड्रग्ज आणि पोलीस बदल्यांमधील दलालांना वाचवण्यासाठी सुरु असलेला एकपात्री प्रयोग असल्याचा” आरोप त्यांनी केला.
सकाळी भाजपा नेते मोहीत भारतीय यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा धाग पुढे पकडून भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात बेदिली माजली आहे. दाऊदचा हस्तक आणि ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत असा रिंकू पठाण याला लॉकडाऊन काळात सोडण्यात आले. तसेच जेव्हा राज्यात पहिला कडकडीत लॉकडाऊन सुरु होते, तेव्हा हा रिंकू पठाण सह्याद्री अतिथी गृहावर जाऊन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रोटेक्शन मनी ठरवण्यासाठी भेटला. राज्यात फेसबुक आणि सोशल मिडियावर कोणी लिहीले तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात आणि दाऊदचा हस्तक गृहमंत्र्यांना सह्याद्रीवर भेटतो? सह्याद्रीच्या आता वसुली अड्डा झालाय का? असा सवाल त्यांनी केला.
रिंकू पठाण भेटल्यानंतर केंद्रीय यंत्रणांनी हळूहळू धागेदोरे जमा करून ड्रग्ज माफियांना अटक करायला सुरुवात केली. सुमारे २० ड्रग्ज वितरकांना अटक करण्यात आली. ही माहिती एनसीबीने एनआयए आणि ईडीला दिली. म्हणून एनसीबीवर उट्ट काढण्यात येते आहे. आरोपी रिंकू पठाण आणि करिम लाला यांच्या माणसांना अटक का करता म्हणून एनसीबीवर उट्ट काढण्यात येते आहे. एनसीबीच्या विरोधात कटक कारस्थान रचले जात आहे. राज्यात अशा प्रकारे बेदीली माजल्याचा आरोप त्यांनी केला.
आर्यन खानच्या प्रकरणात एकपात्री प्रयोग गेले महिनाभर सुरु आहे तो घातक आहे. हे आज स्पष्ट झाले. हा एकपात्री प्रयोग राज्याला बदनाम करणारा आणि तरुणांना ड्रग्जच्या खाईत ढकलणारा असल्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आज जे नाव समोर आले तो सुनील पाटील कोण आहे? सुनील पाटील एनसीपीचा सदस्य आहे की नाही? त्चाचा राष्ट्रवादीशी संबंध काय? अजूनही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना संधी देतो. खरे सांगा नाही तर आता आमच्या हाताला बरेच काही लागले आहे. जर सत्य समोर आले तर तुम्हाला बाथरूमच्या आतमध्ये शौचालयात सुध्दा तोंड लपवायला जागा उरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
हा सुनील पाटील माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील आबा यांची बदनामी करतो आणि राष्ट्रवादीला त्यांचे काही वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळपायाची आग मस्तकाला का जात नाही, असा टोला त्यांनी लगावला.
तसेच धक्कादायक म्हणजे हा सुनील पाटील आपल्या संभाषणात आत्ताचे गृहमंत्री माननीय दिलीप वळसे-पाटील यांची बदनामी करतोय. ज्या गृहमंत्री वळसे-पाटील यांचा महाराष्ट्र आदर करतो त्यांच्या विषयी हा सुनील पाटील बोलतो? मद्यपींच्या बैठका?
काय चाललय हे? कसल्या बैठका? कोण हा माणूस? या सुनील पाटलांचा धंदा काय? असा सवालही त्यांनी केला.
या सुनील पाटीलचा धंदा हा मंत्रालयातील बदल्यांच्या दलालीचा आहे. त्यामुळे हा सुनील पाटील गायब आहे, परागंदा आहे की राष्ट्रवादीने त्याला लपवले. आमचा राष्ट्रवादीवर आरोप आहे की, पोलीस बदल्यांमधील मुख्य दलाल हा गायब, परागंदा नसुन त्याला राष्ट्रवादीने सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे का? संरक्षण दिले आहे का? असा सवाल त्यांनी केला.
इंडियन पोलीस सर्व्हिसचा खाक्या मोडकळीस आणण्याचा हा सुनील पाटील प्रयत्न करीत असल्याने त्यावर गुन्हा दाख करुन तपास सीबीआयकडे तपास द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
…म्हणून ही उलटी खेळी खेळली जात असून पोलीस बदल्यांमधील दलालांना वाचवण्याचा कट
सुनील पाटील सुरक्षित स्थळी ठेवले आहे कारण पोलीस बदल्यांमध्ये कोट्यवधीचे व्यवहार झाले. या प्रकरणाच्या मुळाशी सीबीआय जाऊ लागल्यावर राष्ट्रवादीने थैयथैयाट करायला सुरुवात केली. या प्रकरणातील साक्षीदार, दलाल, वाहक, चालक हे सीबीआयच्या हाती लागू नये यासाठी राष्ट्रवादीचा कट सुरु आहे. म्हणून सुनील पाटीलचा हस्तक गोसावी अटक होते. मनिषचे काय झाल समजत नाही सॅम गायब होतो. या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे लपवले जात आहे. म्हणून ही उलटी खेळी खेळली जात असून पोलीस बदल्यांमधील दलालांना वाचवण्यासाठी हे केले जात आहे, असा मोठा कट आहे. ड्रग्ज वितरक, माफियांना कोणी अटक करु नये म्हणून ही खेळी खेळली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दाऊदच्या पुन्हा जीवंत होणाऱ्या भूतापासून शिवसेनेने वाचवावे!
दाऊदचं भूत पुन्हा जीवंत होते आहे. म्हणून शिवसेनेला आमची हातजोडून विनंती आहे. आमच्या सोबत सरकार मध्ये आलात नाही. आता तो विषय ही मागे पडला. पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कट आणि तरुणाईला ड्रग्जच्या जाळ्यात अडकवण्याचा कट .. आणि दाऊदे पुन्हा डोके वर काढणारे भूतपासून शिवसेनेने स्वतःला वाचवावे, एवढी विनंती त्यांनी केली.